Sunday, October 12, 2025

जव्हार शहरातील १२ अंगणवाडी केंद्रांवर लसीकरण ठप्प

जव्हार शहरातील १२ अंगणवाडी केंद्रांवर लसीकरण ठप्प

जव्हार शहरातील तब्बल १२ अंगणवाडी केंद्रांवरील गरोदर माता आणि बालकांसाठी सुरू असलेले लसीकरण व आरोग्य तपासणीचे काम गेल्या तीन महिन्यांपासून पूर्णपणे ठप्प झाले आहे. या अचानक खंडित झालेल्या आरोग्यसेवेमुळे शहरातील नागरिक, विशेषतः आदिवासी वस्त्यांतील महिला वर्गात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. गोरवाडी, हनुमान पॉईंट, नवापाडा, महादेवआळी, जांभूळविहीर आदी केंद्रांमध्ये ही सेवा बंद पडली असून, या भागांतील बहुसंख्य महिला आदिवासी समाजातील आहेत. नियमित लसीकरण आणि आरोग्य तपासणी बंद झाल्याने गरोदर माता व नवजात बालकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

आरोग्य विभागाकडून नर्स व आरोग्य कर्मचारी यांची बदली झाल्यानंतर नवीन नियुक्ती न झाल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जाते. परिणामी, महिलांना आता लसीकरणासाठी शहरातील इतर केंद्रांपर्यंत लांबचा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे अनेक माता वेळेवर लसीकरण न करता राहतात आणि बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर युवा आदिवासी संघ, जव्हार यांच्या वतीने तालुका अध्यक्ष संदीप माळी यांच्या नेतृत्वाखाली पतंगशहा कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात,“गरोदर माता व बालकांसाठी असलेली ही आरोग्यसेवा तातडीने सुरू करण्यात यावी आणि बंद असलेल्या केंद्रांवर नवीन नर्सची त्वरित नियुक्ती करावी,”अशी मागणी करण्यात आली आहे...

संदीप माळी यांनी सांगितले की,“ही सेवा ग्रामीण व शहरी दोन्ही भागांसाठी अत्यावश्यक आहे. प्रशासनाने तातडीने कृती केली नाही, तर आंदोलनाचा इशारा दिला जाईल.” निवेदन सादरीकरणावेळी कार्याध्यक्ष कपिल वाढू, सचिव रमेश कोरडा, उपाध्यक्ष सुनील जाबर, माजी कार्याध्यक्ष विनू दादा मौळे, माजी अध्यक्ष महेश भोये, धीरज घुलम, दिपक गावंढा, कल्पेश भोगाडे, सामाजिक कार्यकर्ते चेतन कव्हा, हितेश जाधव, तसेच मदतनीस नेत्रा वांगड, रेणुका गरेल, पुनम गोरे, ज्योत्स्ना वारघडे, आणि पत्रकार प्रमोद मौळे यांच्यासह मोठ्या संख्येने युवा उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनी आरोग्य प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर येत्या काही दिवसांत ही सेवा पुन्हा सुरू झाली नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल. दरम्यान, या प्रकरणाकडे आरोग्य विभागाने गंभीरतेने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी एकमुखी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Comments
Add Comment