
जीवनगंध : पूनम राणे
एक शिरपूर नावाचे गाव होते. डोंगराच्या पायथ्याशी वसलेले. गाव छोटे असले तरी निसर्गरम्य वातावरण होते. तेव्हा काही पर्यटक पावसाळी सहलीचा अनुभव घेण्यासाठी तिथे येत असत. त्यामुळे गावातील गावकऱ्यांना रोजी - रोटीचा मार्ग सहज उपलब्ध होत असे.
याच गावात दोन मैत्रिणी राहत होत्या. एकीचे नाव साक्षी व दुसरे नाव मीनाक्षी होते. दोघींची अतूट मैत्री होती. त्या दोघींचे आई-वडील हे एकमेकांस सुखदु:खात मदत करणारे होते. ते दोघे कुठेही फिरावयास जायचे म्हटले की एकत्र जायचे. एकत्र खरेदी करायचे. साक्षी आणि मीनाक्षी एकाच शाळेत जात होत्या. एकाच वयाच्या असल्याने एकाच वर्गात शिकत होत्या. एकत्र शाळेत जात, एकत्र डबा खात, एकत्र अभ्यास करत, इतकेच नव्हे तर दोघींची आवड निवड सारखीच होती. अशी ही त्यांची मैत्री घनिष्ठ होती.
एके दिवशी अचानक साक्षी आणि मीनाक्षी यांचे कडाक्याचे भांडण लागले. दोघीही हमरीतुमरीवर आल्या. इतर मैत्रिणीने समजावण्याचा प्रयत्न केला. पण दोघींपैकी एकही माघार घेत नव्हती. दोघीही एकमेकीशी बोलत नव्हत्या. शाळेत जातानाही दोघीजणी वेगवेगळ्या वेळेला घरातून बाहेर पडल्या. ही गोष्ट दोघींच्या पालकांच्या नजरेतून सुटली नाही. मग दोघींचेही पालक एकत्र झाले. संध्याकाळी शाळेतून आल्यावर दोन्ही पालकांनी त्यांना एकत्र घेऊन समजावले. वर्गातल्या एका मुलीने दोघींच्या मैत्रीत विष कालवले होते.
मुळात खरी गोष्ट काय आहे हे समजल्यानंतर दोघींना आपली चूक कळून आली. कित्येक वर्षांची आपली मैत्री आपल्या पालकांमुळे शाबूत राहिली याचा दोघींनाही अत्यंत आनंद झाला. दोघींनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. साक्षीला फारच वाईट वाटले. माझ्याशी मीनाक्षी याआधी अशी केव्हाच वागली नव्हती. मीनाक्षीच्या मनात कोणीतरी काहीतरी भरवले होते. तेव्हा साक्षी पुन्हा एकदा मीनाक्षीला म्हणाली, “यापुढे कोणीही आपल्या दोघींच्या मैत्रीमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला तर, प्रथम आपण दोघींनी अबोला न धरता एकमेकीशी बोलून खरे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया.”
यावर मीनाक्षी हसत हसत म्हणाली, “मला कधीही असं वाटलं नव्हतं, की कोणाच्या तरी सांगण्यावरून आपल्या दोघींमध्ये एवढा मोठा गैरसमज निर्माण होईल. पण काही का होईना आपल्या पालकांमुळे आपण पुन्हा एकत्र झालो. दोघींचा अबोला सुटल्यामुळे दोघांच्याही पालकांना अत्यंत आनंद झाला.
तात्पर्य : कधीही कोणाच्याही सांगण्यावरून आपली जिवाभावाची नाती तोडू नयेत.