
विशाखापट्टणम: आयसीसी महिला विश्वचषक २०२५ मधील १३व्या सामन्यात भारतीय महिला संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ३३१ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले आहे. डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदानावर झालेल्या या सामन्यात भारताच्या सलामीच्या फलंदाजांनी केलेल्या दमदार खेळाच्या बळावर हा विक्रमी स्कोर उभारला.
ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हीलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारताच्या सलामीवीर स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल यांनी तिच्या या निर्णयाला चुकीचे ठरवले. स्मृती मंधाना (८०) आणि प्रतिका रावल (७५) यांनी भारताला जबरदस्त सुरुवात करून दिली. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी तब्बल १५५ धावांची शानदार भागीदारी केली.
मंधानाने ६६ चेंडूंमध्ये ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ८० धावांची धडाकेबाज खेळी केली. तिला शतक पूर्ण करता आले नाही, पण तिने संघाच्या मोठ्या स्कोअरचा पाया रचला. प्रतिका रावलनेही संयमी पण प्रभावी फलंदाजी करत ७५ धावांचे अर्धशतक झळकावले.
हरमनप्रीत कौर (२२) आणि हरलीन देओल (३८) यांनी चांगला फॉर्म दाखवला. त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्स (३३) आणि रिचा घोष (३२) यांनीही जलद धावा करत संघाचा धावफलक वेगाने पुढे नेला. एका वेळी भारत ३०० धावांचा टप्पा सहज पार करेल असे वाटत असताना, अखेरच्या षटकांमध्ये भारताचा डाव गडगडला. भारताने केवळ ३६ धावांत आपले शेवटचे ६ बळी गमावले आणि संघ ४८.५ षटकांत ३३० धावांवर सर्वबाद झाला.
ऑस्ट्रेलियाकडून अनाबेल सदरलँडने शानदार गोलंदाजी करत ५ महत्त्वपूर्ण बळी घेतले. महिला विश्वचषकात ५ बळी घेणारी ती या स्पर्धेतील पहिली गोलंदाज ठरली. डावखुरी फिरकी गोलंदाज सोफी मोलिनिउक्सने देखील प्रभावी मारा करत ३ गडी बाद केले. मेगन शट आणि ॲश्ले गार्डनर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
भारताने ३३१ धावांचे मोठे लक्ष्य दिल्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर एक मोठे आव्हान आहे. ऑस्ट्रेलियन संघाने आपला धावांचा पाठलाग सुरू केला असून, कर्णधार एलिसा हीली आणि फीबी लीचफिल्ड यांनी सलामीला सुरुवात केली आहे. भारताला सामना जिंकायचा असेल, तर ऑस्ट्रेलियाच्या मजबूत फलंदाजीला लवकर रोखण्यासाठी त्यांना प्रभावी गोलंदाजी करावी लागेल.