
विधानसभेच्या २४३ जागांमध्ये १०१ जेडीयू , १०० भाजप , २९ लोजप (आर), ७ हिंदुस्तानी अवामी मोर्चा आणि ६ राष्ट्रीय लोक मोर्चा
पाटणा : राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचे जागा वाटपाचे सूत्र ठरले आहे. गेल्या काही दिवसांपासून जागा वाटपाच्या चर्चा सुरु होत्या. एनडीएमधील घटक पक्षांमध्ये नाराजीनाट्यदेखील पाहायला मिळाले. मात्र अखेर जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झालेला आहे. गेल्या निवडणुकीत मोठ्या फरकाने मोठा भाऊ ठरुनही भाजपने यंदा लहान भावाची भूमिका स्वीकारली आहे. भाजपने मित्रपक्षांसाठी मोठे बलिदान दिले आहे. एनडीएतील लहान पक्षांना सन्मानजनक जागा देण्यात आलेल्या आहेत.
बिहार विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होईल. ६ आणि ११ नोव्हेंबरला मतदान होईल. तर १४ नोव्हेंबरला मतमोजणी असेल. बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण २४३ जागा आहेत. यातील १०१ जागा जेडीयू , १०० जागा भाजप , २९ जागा लोजप (आर), ७ जागा हिंदुस्तानी अवामी मोर्चा आणि ६ जागा राष्ट्रीय लोक मार्चा लढवेल. गेल्या निवडणुकीत जेडीयूने ११५ जागा लढवल्या होत्या. त्यातील ४३ जागांवर पक्षाला विजय मिळाला होता. यंदा जेडीयू १४ जागा कमी लढवणार आहे. जेडीयूने या जागा मित्रपक्षांसाठी सोडल्या आहेत.
मागील निवडणुकीत भाजपचा स्ट्राईक रेट उत्तम होता. २०२० मध्ये भाजपने ११० जागा लढवून ७४ जागा जिंकल्या होत्या. मात्र यंदा भाजप १०० जागा लढवणार आहे. भाजपने १० जागांचे बलिदान मित्रपक्षांसाठी दिले आहे. यंदा एनडीएमध्ये दोन पक्ष वाढले आहेत. तर एक पक्ष आघाडीतून बाहेर पडला आहे. लोजप (आर) आणि रालोमो पुन्हा एनडीएमध्ये परतले आहेत. चिराग पासवान यांच्या लोजपने (आर) जागावाटपात २९ जागा मिळवल्या आहेत. सुरुवातीला त्यांनी ४० ते ४५ जागा मागितल्या होत्या. मग त्यांनी आपली मागणी ३५ वर आणली. भाजपने त्यांना २५ ते २६ जागा देऊ केल्या. सोबत विधान परिषद आणि राज्यसभेची प्रत्येकी एक जागा देऊ केली. अखेर लोजप (आर) २९ जागा लढवणार आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत लोजप स्वबळावर लढला होता. त्यांनी १३४ जागांवर उमेदवार दिले. यातील बहुतांश जागा एनडीएमध्ये जेडीयूच्या वाट्याला गेल्या होत्या. भाजपला केवळ १ जागा जिंकता आली. पण लोजप उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे जेडीयूने जवळपास ३५ जागा गमावल्या. २०१५ मध्ये ७१ जागा जिंकणारा जेडीयू २०२० मध्ये ४३ जागांवर आला. जेडीयूने ३५ जागा गमावल्याने भाजप एनडीएमध्ये आपोआप मोठा भाऊ झाला. एनडीएला १२५ जागांवर समाधान मानावे लागले. त्यांना काठावरचे बहुमत मिळाले.