
प्रकल्पाचा अभ्यास व शिफारसीसाठी समिती स्थापन
मुंबई : गणेशोत्सव असो नवरात्रोत्सव सदैव मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या पोलिसांची धावपळ आता कमी होणार आहे. ज्या ठिकाणी पोलीस स्टेशन होते आता त्या पोलीस स्टेशनच्या आवारात घरे बांधण्याचा निर्णय राज्य सरकारच्या गृह विभागाने घेतला आहे. तब्बल ५५ हजार घरे बांधण्यात येणार असून ती ४५० ते ६०० चौरस फुटांची व सोयीसुविधांसह बांधण्यात येणार आहेत. दरम्यान, पोलिसांची होणारी धावपळ, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या उद्देशाने पोलीस स्टेशनच्या आवारात घरे बांधण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे गृह विभागाचे उपसचिव चेतन निकम यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या १४ कोटींच्या घरात पोहोचली असून जनतेच्या सुरक्षेसाठी पोलीस दलाचे मजबुतीकरण करण्यात येत आहे. सध्या महाराष्ट्र पोलीस दलात १ लाख ९५ हजार पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यापैकी मुंबई पोलीस दलात ५१ हजार ३०८ पोलीस दलात कार्यरत आहेत.
मात्र माया नगरी मुंबईत स्वतःचे घर घेणे आवाक्याबाहेर असून घराचे भाडे ही खिशाला परवडणारे नाही. त्यामुळे अनेक मुंबई पोलीस मुंबई बाहेर ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ बदलापूर याठिकाणी वास्तव्यास आहेत. मुंबईपासून ६० ते ८० किलोमीटर लांब राहत असल्याने आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांना वेळेवर ड्युटीवर हजर राहणे शक्य होत नाही. त्यामुळे पोलिसांना पोलीस स्टेशनच्या आवारात घर उपलब्ध करुन देण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. मुंबईत पोलिसांच्या २० वसाहती असून ती अपुरी पडतात. त्यामुळे गृह विभागाने मुंबईत ५५ हजार घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मुंबईतील ७५ प्लांट्स बघण्यात आले असल्याचे निकम यांनी सांगितले. दरम्यान, पुढील तीन ते चार वर्षांत ही घरे बांधण्याचे उद्दीष्ट असल्याचे गृह विभागातील अधिकाऱ्याने सांगितले आहे.
मुंबई पोलीसांचा इतिहास हा मुंबई शहराच्या प्रगतीशी घट्ट जोडलेला असून, सन १८५६ मध्ये स्थापन झालेले पोलीस आयुक्तालय आज देशातील सर्वोत्कृष्ट व आदर्श पोलीस दलांपैकी एक आहे. मुंबई पोलीसांना सुरक्षेच्या जबाबदाऱ्या मोठ्या प्रमाणात पार पाडाव्या लागतात. त्यामुळे पोलिसांची दगदग कमी व्हावी त्यांना आरोग्याची काळजी घेण्यासह कुटुंबियांसमवेत वेळ घालवता यावा, यासाठी मुंबईत ५५ हजार घरे बांधण्यात येणार आहेत.