Thursday, October 9, 2025

तीन दिवसांचा माणिक स्वर महोत्सव

तीन दिवसांचा माणिक स्वर महोत्सव

महाराष्ट्राच्या लाडक्या गायिका, पद्मश्री माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी (२०२५–२०२६) वर्षानिमित्ताने देशभरात विविध सांगीतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘माणिक मोती’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यापासून ते ‘माणिक रत्न पुरस्कार’पर्यंत अनेक उपक्रमांना रसिकांनी दिलेला भरभरून प्रतिसाद लक्षात घेता, आता माणिक वर्मा फाउंडेशन आणि पंचम निषाद यांच्या संयुक्त विद्यमाने एक भव्य त्रिदिवसीय शास्त्रीय संगीत महोत्सव -‘माणिक स्वर महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.

हा महोत्सव रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे आज शुक्रवार १० ऑक्टोबर सायं. ८ वा , शनिवार, ११ ऑक्टोबर २०२५ - सायं. ८ वा. आणि रविवार, १२ ऑक्टोबर २०२५ - सकाळी १० वा. असे तीन दिवस रंगणार आहे. या स्वर महोत्सवात इंद्राणी मुखर्जी, जयतीर्थ मेवुंडी, व्यंकटेश कुमार ,मंजिरी असनारे केळकर, देवकी पंडित, ओंकार दादरकर असे नामवंत गायक-गायिका माणिकताईंना सुरेल आदरांजली अर्पण करतील.

महोत्सवात माणिक वर्मा फाउंडेशन व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) तर्फे संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी खालील पुरस्कार प्रदान केले जातील : माणिक गंधार पुरस्कार – श्रीधर फडके, अशोक हांडे, डॉ. विद्याधर ओक, आनंद भाटे माणिक स्मृती पुरस्कार – ओंकार दादरकर, नीलाक्षी पेंढारकर, अप्पा वढावकर

“माझं आईवरचं प्रेम कुठल्या शब्दात लिहू आणि सांगू तेच कळत नाही. शास्त्रीय संगीतातील अभिजात परंपरा तिने आपल्या गोड, मधुर स्वरांनी, जिद्द, मेहनत आणि चिकाटीने सांभाळून जपली, वाढवली आणि रसिकांची मनं जिंकून घेतली. तिच्या जन्मशताब्दी निमित्ताने, तिच्या मुली होण्याचं ऋण आम्ही ‘माणिक मोती’ या पुस्तकाद्वारे आणि ३ दिवसीय शास्त्रीय संगीताच्या ‘माणिक स्वर महोत्सव’ या कार्यक्रमाद्वारे फेडण्याचा प्रयत्न करीत आहोत.” - राणी वर्मा

आईचे स्वर आजही माझ्या कानावर आणि हृदयात जिवंत आहेत. तिच्या शास्त्रीय संगीतामुळे आमच्या जीवनात आणि रसिकांच्या मनात अमूल्य वारसा निर्माण झाला. तिच्या शताब्दी वर्षात, ‘माणिक स्वर महोत्सव’द्वारे तिला आदरांजली वाहताना मला अतूट अभिमान आणि आनंद होतो.” — वंदना गुप्ते

“आई म्हणजे साधेपणा, प्रेम आणि सातत्यपूर्ण प्रोत्साहनाचं मूर्त स्वरूप. जिथे तिचा सूर संपतो, तिथून तिचं आदर्श जीवन सुरू होतं — सदैव नम्र, भोळी आणि आमच्या आयुष्याला आत्मविश्वास देणारी - भारती आचरेकर

“माणिकताईंचे संगीत हे पिढ्यान्पिढ्या स्मरणात राहील असा एक अमूल्य खजिना आहे. त्यांच्या स्वरांमध्ये माधुर्य, साधना आणि परंपरेचा दैवी स्पर्श होता. ‘माणिक स्वर महोत्सव’ हा केवळ आदरांजली नाही, तर पुढील पिढ्यांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरेल.” - शशी व्यास (संस्थापक व संचालक, पंचम निषाद):

माणिक वर्मा – महाराष्ट्राचे “माणिक रत्न” माणिकताई वर्मा या केवळ गायिका नव्हत्या, तर भारतीय संगीत परंपरेतील एक देदीप्यमान व्यक्तिमत्त्व होत्या. त्यांच्या गोड, मधुर स्वरांनी आणि अपार मेहनतीने त्यांनी शास्त्रीय संगीत, भावगीत, नाट्यसंगीत, भक्तिगीत तसेच उपशास्त्रीय प्रकारांमध्ये अविस्मरणीय ठसा उमटवला. तेव्हा ‘माणिक स्वर महोत्सव’ हा केवळ सांगीतिक सोहळा नसून, महाराष्ट्राच्या या अमूल्य ‘माणिक रत्नाला’ वाहिलेली कृतज्ञ आदरांजली आहे.

Comments
Add Comment