
विशाखापट्टणम: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५मध्ये द. आफ्रिकेच्या संघाने भारतीय संघाचा विजयरथ रोखला आहे. आफ्रिकेने या सामन्यात ३ विकेट राखत विजय मिळवला आहे. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना क्रिकेटपटू रिचा घोषच्या ९४ धावांच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर द. आफ्रिकेसमोर विजयासाठी २५२ धावांचे आव्हान ठेवले होते. आफ्रिकेने हे आव्हान ३ विकेट राखत पूर्ण केले.
पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने ४९.४ षटकांत सर्वबाद २५१ धावा केल्या. रिचा घोषने केलेल्या जबरदस्त खेळीमुळे भारताला ही आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. या सामन्यात द. आफ्रिकेला जिंकण्यासाठी २५२ धावांची आवश्यकता होती. याचवेळी द. आफ्रिकेची डी क्लर्क धावून आली. तिने ८४ धावांची तुफान खेळी केली. त्याच्या जोरावर आफ्रिकेने या सामन्यात ३ विकेट राखत विजय मिळवला.
नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार लॉरा वोलव्हार्टने (Laura Wolvaardt) प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात संथ झाली. स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि प्रतीका रावळने (Pratika Rawal) ५५ धावांची सलामी दिली, मात्र मानधना २३ धावांवर बाद झाली. त्यानंतर भारताची मधली फळी ढेपाळली आणि एका क्षणी भारताची अवस्था ७ बाद १५३ अशी झाली होती. अशा परिस्थितीत, ऋचा घोषने डाव सावरत दमदार फलंदाजी केली. तिने केवळ ७७ चेंडूत ११ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ९४ धावांची खेळी केली. तिला स्नेह राणा (Sneh Rana) (२४ चेंडूत ३३) हिने चांगली साथ दिली. या दोघांनी ८८ धावांची भागीदारी करून भारताचा डाव ४९.५ षटकांत २५१ धावांपर्यंत पोहोचवला. दक्षिण आफ्रिकेकडून क्लो ट्रायॉनने ३ तर मारिझाने कॉप आणि नॉनकुलुलेको मलाबा यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.