Friday, October 31, 2025
Happy Diwali

मोदी सरकारची रेल्वेच्या २४ हजार ६३४ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी, महाराष्ट्राच्या वर्धा - भुसावळ तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी

मोदी सरकारची रेल्वेच्या २४ हजार ६३४ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी, महाराष्ट्राच्या वर्धा - भुसावळ तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय समितीने रेल्वे मंत्रालयाच्या 24 हजार ६३४ कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी दिली. यात महाराष्ट्रातील वर्धा - भुसावळ तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेच्या प्रकल्पाचाही समावेश आहे.

रेल्वेचे केंद्राने मंजूर केलेले प्रकल्प

अ. वर्धा -भुसावळ - तिसरी आणि चौथी लाईन ३१४ किमी (महाराष्ट्र)

ब. गोंदिया - डोंगरगड-- - चौथी लाईन ८४ किमी (महाराष्ट्र आणि छत्तीसगड)

क. बडोदा रतलाम तिसरी आणि चौथी लाईन २५९ किमी (गुजरात आणि मध्य प्रदेश)

ड. इटारसी भोपाळ बीना चौथी लाईन २३७ किमी (मध्य प्रदेश)

या चार प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि छत्तीसगड या राज्यांमधील अठरा जिल्ह्यांतील भारतीय रेल्वेचे विद्यमान जाळे ८९४ किमीने वाढणार आहे. आज मंजूर झालेला हा बहुपदरीकरण प्रकल्प सुमारे तीन हजार ६३३ गावांच्या संपर्क सुविधेत सुधारणा करेल. या गावांची एकूण लोकसंख्या ८५.८४ लाख असून त्यामध्ये विदिशा आणि राजनांदगाव या दोन आकांक्षित जिल्ह्यांचा समावेश आहे.

रेल्वे मार्गांच्या वाढलेल्या क्षमतेमुळे गतिशीलतेत सुधारणा होऊन भारतीय रेल्वेला अधिक सुधारित परिचालनात्मक कार्यक्षमता आणि सेवाविषयक विश्वासार्हता प्राप्त होईल. हे बहुपदरीकरण प्रस्ताव रेल्वेचे कामकाज सुरळीत करण्यासाठी आणि गर्दी कमी करण्यासाठी आहेत.

हे सर्व प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नवीन भारत’ या दृष्टिकोनाशी सुसंगत असून, या प्रदेशातील नागरिकांना सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून “आत्मनिर्भर” बनविण्याचे उद्दिष्ट साध्य करतील. या उपक्रमांमुळे स्थानिक नागरिकांच्या रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींना चालना मिळेल.

हे प्रकल्प पीएम-गतीशक्ती राष्ट्रीय बृहत आराखड्याच्या आधारे आखले गेले आहेत. त्यात मल्टिमोडल कनेक्टिव्हीटी आणि लॉजिस्टिक कार्यक्षमतेचा विकास साधण्यासाठी समन्वित नियोजन व हितधारकांशी सल्लामसलत यावर भर देण्यात आला आहे. या प्रकल्पांमुळे लोक, वस्तू व सेवा यांच्या अखंड वाहतुकीसाठी सुलभ संपर्क सुविधा उपलब्ध होईल.

प्रकल्प विभागात सांची, सातपुडा व्याघ्र प्रकल्प, भीमबेटका येथील शैलाश्रय, हजारा धबधबा, नवागाव राष्ट्रीय उद्यान अशा प्रमुख पर्यटन स्थळांना रेल्वे संपर्क उपलब्ध होईल, ज्यामुळे देशभरातील पर्यटकांना या प्रदेशाकडे आकर्षित केले जाईल.

हा रेल्वेमार्गावरील महत्त्वाचा वाहतूक मार्ग असून, या मार्गाने कोळसा, कंटेनर, सिमेंट, फ्लाय अॅश, अन्नधान्य, पोलाद इत्यादी वस्तूंची वाहतूक केली जाते. क्षमतेत वाढ झाल्यामुळे ७८ एमटीपीए (मिलियन टन प्रति वर्ष) इतकी अतिरिक्त मालवाहतूक शक्य होईल.

रेल्वे हा पर्यावरणपूरक आणि ऊर्जा कार्यक्षम वाहतूकमार्ग असल्याने हे प्रकल्प देशाच्या हवामान उद्दिष्टांच्या पूर्ततेस हातभार लावतील, लॉजिस्टिक खर्चात घट करतील, तसेच २८ कोटी लिटर तेल आयातीत बचत आणि १३९ कोटी किलो कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनात घट घडवतील, जे सहा कोटी झाडे लावण्यासमान आहे.

Comments
Add Comment