बंदरे विकास मंत्री नितेश राणेंचे निर्देश
विरार (प्रतिनिधी) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीतून दिलासा देणाऱ्या विरार-सफाळे जलमार्गावर अतिरिक्त नौकेद्वारे वाढीव फेऱ्या सुरू करण्याचे निर्देश राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत. या संदर्भात भाजपचे आमदार राजन नाईक यांनी मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन वाढीव नौकेची मागणी केली होती.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वसई-विरार शहर व पालघर तालुक्यातील शेकडो प्रवाशांना नौका प्रवास सोयीस्कर पडत आहे. गेल्या पाच महिन्यांपासून विरार-मारंबळ पाडा ते सफाळेपर्यंत सुरू झालेल्या या सेवेमुळे वाहनाबरोबरच प्रवाशांनाही प्रवास करणे सोयीचे असल्यामुळे नागरिकांची या सेवेला पसंती मिळाली. मात्र, मर्यादित फेऱ्यांमुळे अनेक प्रवाशांची गैरसोय होत होती. या पार्श्वभूमीवर आणखी अतिरिक्त नौका मंजूर करून वाढीव फेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी राज्याचे बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्याकडे आमदार राजन नाईक यांनी केली. त्यावर मंत्री नितेश राणे यांनी तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश मेरिटाईम बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे लवकरच मारंबळपाडा ते सफाळेपर्यंत जादा नौकेतून वाढीव फेऱ्या सुरू होणार आहेत.
तसेच वाढवण बंदरामुळे खारवाडेश्री व नारिंगी येथून मोठ्या प्रमाणावर जहाजांची वाहतूक सुरू होईल. या जहाजांची बांधणी वा दुरुस्तीसाठी पालघर तालुक्यातील खारवाडेश्री व वसई तालुक्यातील नारिंगी येथे कार्गो जेट्टी यार्ड उभारावे, अशी मागणी सुद्धा आमदार नाईक यांनी मंत्री राणे यांच्याकडे केली आहे. याबाबत सर्वेक्षण करून प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश त्यांनी मेरिटाईम बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे कार्गो जेट्टीसाठी प्रयत्नशील आहोत, असे आमदार राजन नाईक यांनी सांगितले.