Sunday, October 5, 2025

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार भरीव मदत करणार – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार भरीव मदत करणार – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

केंद्रीय मंत्री शाह यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा नूतनीकरण शुभारंभ

शिर्डी : अतिवृष्टी व पुरामुळे महाराष्ट्रातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून महाराष्ट्र शासनाकडून नुकसानीचा तपशीलवार अहवाल मिळताच केंद्र सरकार क्षणाचाही विलंब न करता शेतकऱ्यांसाठी भरीव मदत जाहीर करेल, अशी ग्वाही केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी दिली. लोणी येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या नूतनीकरण शुभारंभप्रसंगी केंद्रीय मंत्री शाह बोलत होते. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आदी मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय मंत्री शाह म्हणाले, केंद्र सरकारने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ३ हजार १३२ कोटींची मदत मंजूर केली आहे. यापैकी एप्रिलमध्ये १ हजार ६३१ कोटी वाटप करण्यात आले असून, यात महाराष्ट्रासाठी २१५ कोटींचे विशेष मदत पॅकेज देण्यात आले आहे. कर्जवसुलीवर तात्पुरती स्थगिती व विद्यार्थ्यांसाठी परीक्षांमध्ये सवलती यांसारखे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व पद्मविभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी सहकार आंदोलन, ग्रामीण विकास व शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केलेले कार्य अभूतपूर्व आहे. त्यांच्या कार्याच्या पायावर आज महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र उभे आहे. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, धनंजयराव गाडगीळ व वैकुंठभाई मेहता यांनी सहकार चळवळीची पायाभरणी केली. विखे पाटील यांनी देशातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू करून शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा पाया रचला. व्यापाऱ्यांच्या घरात जाणारा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात जाऊ लागला. डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये वित्त राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. त्यांनी आरबीआयमार्फत गुजरातमधील सहकारी बँकांना वाचविणारे महत्त्वपूर्ण ‘रिव्हायव्हल पॅकेज’ मिळवून दिले, असे केंद्रीय मंत्री शाह म्हणाले. १९५१ मध्ये ५० टन क्षमतेने सुरू झालेला डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना आज ७ हजार २०० टन क्षमतेने कार्यरत आहे. लवकरच त्याची क्षमता १५ हजार टनांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. १९७० मध्ये स्थापन झालेल्या डिस्टिलरीची क्षमता १५ केएलपीडी वरून ९० केएलपीडीपर्यंत वाढली असून २४० केएलपीडीपर्यंत विस्तारास मंजुरी देण्यात आली आहे. बायोगॅस संयंत्राची क्षमता १२ हजार घनमीटरवरून ३० हजार घनमीटरपर्यंत वाढविण्यात आली आहे. को-जनरेशन प्लांटमधून ८ मेगावॅट वीज निर्माण होते, असे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा १० हजार कोटींहून अधिक प्राप्तिकर माफ केला आहे. यामुळे सहकारी साखर कारखान्यांवरील वार्षिक १०० कोटींचा कर भार दूर झाला आहे. साखर उत्पादनासाठी लागणाऱ्या मोलायसिसवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला असून ३९५ वस्तूंवरील जीएसटी दरही घटविण्यात आले आहेत. सहकारी साखर कारखान्यांनी मल्टी-फीड इथेनॉल प्रकल्प उभारावेत, ज्यातून मका व तांदळापासूनही इथेनॉल तयार करता येईल. अशा प्रकल्पांसाठी केंद्र सरकार कर्ज उपलब्ध करून देईल व इथेनॉल खरेदीत सहकारी संस्थांना प्राधान्य दिले जाईल, असेही केंद्रीय मंत्री शाह यांनी सांगितले. भारताला जगात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी या दिवाळीत आपण सर्वांनी एकत्र येऊन घरात कोणतीही परदेशी वस्तू आणणार नाही असा संकल्प करावा. देशातील १४० कोटी लोकांनी व व्यापाऱ्यांनी ‘मेक इन इंडिया’चा अंगीकार केला, तर २०४७ पूर्वी भारत जगातील पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल, असेही शाह यांनी नमूद केले.

नदीजोड प्रकल्पाद्वारे राज्याचा दुष्काळ दूर करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी महाराष्ट्रात सहकाराची चळवळ रुजवली आणि आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी जल नियोजनाच्या संदर्भात महाराष्ट्रात जागृती घडवून आणली. या दोघांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे अनावरण हे ‘पद्मस्मरण’ आहे असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना असलेल्या प्रवरानगर येथील सहकारी साखर कारखान्याने १० हजार टीपीडीपर्यंत आता मजल मारली आहे. ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्र सहकाराची पंढरी आहे. या क्षेत्राच्या विकासाचे श्रेय डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता यांना जाते. त्यांनी सहकार चळवळीची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर येथे उभा राहिला. महाराष्ट्रामध्ये ज्या-ज्या भागात सहकार चळवळ पोहोचली, सहकारी साखर कारखाने पोहोचले, तिथला शेतकरी समाधानी झाला आणि त्या ठिकाणचे औद्योगीकरणदेखील चांगल्याप्रकारे झाले, इथला शेतकरी संपन्न झाला. पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी सहकार चळवळ पुढे नेण्यासोबत जलसंवर्धन चळवळ महाराष्ट्रात रुजविण्याचे कार्य केले. राज्य शासनाने त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबविण्याचा आणि त्यातून राज्यातील दुष्काळ दूर करण्याचा निश्चय केला आहे. विदर्भामध्ये वैनगंगा – नळगंगा, तापीच्या खोऱ्यामध्ये पाणी आणायचं काम, उल्हास खोऱ्यातले समुद्रात वाहून जाणारे ५४ टीएमसी पाणी उचलून गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून आणि गोदावरीच्या खोऱ्यातला दुष्काळ दूर करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. पुढच्या पाच ते सात वर्षात टप्प्या-टप्प्याने हे संपूर्ण पाणी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणल्यानंतर नाशिक, अहिल्यानगर परिसर आणि मराठवाड्याचा दुष्काळ भूतकाळ असेल, असे कार्य राज्य शासन करेल, असे मुख्यमंत्री विश्वासाने म्हणाले. प्रधानमंत्री मोदी यांनी पहिल्यांदा सहकाराचे महत्त्व समजून घेतलं आणि स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन केले आणि सहकारातला कार्यकर्ता म्हणून पहिले सहकार मंत्री म्हणून केंद्रीय मंत्री शाह यांना जबाबदारी देण्यात आली. सहकारमंत्री म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर त्यांनी वेगाने निर्णय घेऊन या क्षेत्रातील धुरिणींना चकित केले. राज्यातल्या सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासाठी ८ ते १० हजार कोटींची मदत देण्यात आली. सहकार चळवळ रुजविण्याचे कार्य केंद्र सरकारच्या चांगल्या निर्णयाने होत आहे. साखर कारखान्याच्या सर्क्यूलर इकॉनॉमी विकसित करण्यासाठी आता प्रयत्न करावे लागतील. साखर कारखान्याचा मालक शेतकरी आहे, म्हणून त्याच्या पाठीशी शासन उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. शेतकऱ्याला अतिवृष्टीच्या संकटातून सावरण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत असून लवकरच भरीव मदत करण्यात येईल, यात केंद्र सरकारचेही सहकार्य मिळेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

लोणी – प्रवरानगर देशातील ग्रामीण विकासाचे मॉडेल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, लोणी-प्रवरानगर परिसरातून महाराष्ट्रातला नाही तर देशाला सहकाराचा वारसा मिळाला. शेतकरी संघटित होऊन आणि एकजुटीने क्रांती घडवू शकतो हे या भूमीने दाखवून दिले. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी लोणीला पहिला सहकार क्षेत्रातील साखर कारखाना उभारून सहकाराची क्रांती घडवून आणली. शेतकऱ्यांच्या घामाला योग्य मोबदला मिळावा, त्यांच्या पिकाला चांगला भाव मिळाला पाहिजे, त्यांची मुलं शिक्षण घेऊन पुढे जावीत म्हणून विठ्ठलरावांनी संपूर्ण आयुष्य वेचलं आणि त्यांचा हाच वारसा लोकनेते बाळासाहेब विखे पाटील यांनी जीवापाड जपला. त्यांनी सहकार, शेतीपुरते कार्य मर्यादित न ठेवता प्रवरा मेडिकल कॉलेज, प्रवरा को-ऑपरेटिव्ह बँक, शैक्षणिक संस्था कृषी व आरोग्य प्रकल्प यांच्या माध्यमातून संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यालाच खऱ्या अर्थाने नवसंजीवनी दिली आहे. त्यानंतरही पुढील पिढीने हे कार्य पुढे नेल्याने आज लोणी-प्रवरानगर देशातील ग्रामीण विकासाचे मॉडेल म्हणून ओळखले जाते. सहकारमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्राची वेगाने वाटचाल सुरू आहे. जुन्या परंपरा आणि नवतंत्रज्ञान, नवसंशोधन याची सांगड घालण्याचा प्रयत्न होतं आहे. साखर उद्योगांमध्ये पारदर्शकता आणण्यासोबत इथेनॉल उत्पादनाला चालना देण्यात आली आहे. त्याचा लाभ शेतकऱ्याला मिळाला पाहिजे असे केंद्राचे प्रयत्न आहेत. सहकाराच्या माध्यमातून देश आत्मनिर्भर होईल, महाराष्ट्र आत्मनिर्भर होईल यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. अतिवृष्टी आणि पुरामुळे संकटात आलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारतर्फे मदत मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

सहकारच्या प्रवासाला दिशा देणारा क्षण – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी प्रवरानगरच्या माळावर आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना उभा केला आणि त्यामुळे महाराष्ट्राचा देशातल्या सहकारी साखर कारखानदारीला नवी दिशा मिळाली, महाराष्ट्र खऱ्या अर्थाने समृद्ध झाला. तर देशाचे पहिले सहकार मंत्री म्हणून अमित शाह यांनी साखर कारखान्यांना प्राप्तिकर रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. म्हणून सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील या सहकार चळवळीसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या पिता पुत्रांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण देशाचे पहिले सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणे हा दुग्धशर्करा योग आहे. सहकाराच्या प्रवासाला एक नवीन दिशा देणारा हा एक महत्वाचा क्षण आहे, सहकारच्या शतकातले एक सुवर्णपान आहे. शेतकऱ्याला आपली ताकद ओळखायला लावायची आणि सहकारच्या माध्यमातून त्याला सशक्त करायचं या विचारातूनच आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगरला उभा राहिला. हा केवळ उद्योग नव्हता तर तो ग्रामीण भारतातील परिवर्तनाचा एक आरंभबिंदू होता. आज या कारखान्याची क्षमता वाढत असताना शेतकऱ्यांनाही नवे तंत्रज्ञान स्वीकारून उत्पादन वाढवावे लागेल. सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या घरामध्ये समृद्धी आली, त्यांच्या मदतीने शिक्षण संस्था उभ्या राहिल्या, ग्रामीण भागामध्ये लक्ष्मी बरोबरच सरस्वतीदेखील नांदू लागली. सहकार चळवळ अडचणीत येत असताना केंद्र सरकारने ‘सहकारातून समृद्धी’ ही संकल्पना व्यवहारात आणली. मोलायसिसवरील कर २८ टक्क्यावरून ५ टक्क्यावर आणण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. नव्याने स्थापन झालेल्या सहकार क्षेत्रातील संस्थानमुळे राज्याच्या सहकार क्षेत्राला संजीवनी मिळाली आहे, असे पवार म्हणाले. नैसर्गिक आपत्तीतून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी लवकरच पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यात येईल, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले. प्रास्ताविकात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. केंद्रीय सहकारमंत्री प्रवरानगरमध्ये दुसऱ्यांदा येत आहेत. देशातील पहिल्या सहकार मंत्रालयाची जबाबदारी ते सक्षमपणे सांभाळत आहेत. केंद्र सरकारच्यावतीने सहकार चळवळीला दिशा देण्याचे काम केले जात आहे. राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिम वाहिनींच्या नद्यांचे पाणी मराठवाड्यात आणण्याचे काम राज्य शासन करत आहे. येत्या काळात राज्य निश्चितच दुष्काळमुक्त होईल. सहकार चळवळीच्या विचारांशी कधीही प्रतारणा होऊ दिली जाणार नाही. प्रवरा उद्योग समूहाच्यावतीने राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १ कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी आमदार रवींद्र चव्हाण, शिवाजीराव कर्डिले, मोनिका राजळे, अमोल खताळ, आशुतोष काळे, किरण लहामटे, विक्रम पाचपुते, विठ्ठलराव लंघे, काशिनाथ दाते, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आदी उपस्थित होते.
Comments
Add Comment