Saturday, October 4, 2025

IND vs WI: भारताने ४४८वर पहिला डाव केला घोषित, २८६ धावांची घेतली आघाडी

IND vs WI: भारताने ४४८वर पहिला डाव केला घोषित, २८६ धावांची घेतली आघाडी

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला तिसऱ्या दिवशी नाट्यमय वळण मिळाले. दुसऱ्या दिवसाअखेर ५ गडी गमावून ४४८ धावा करणाऱ्या भारतीय संघाने, तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वीच आपला पहिला डाव घोषित करण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेतला. यासह भारताने वेस्ट इंडिजवर पहिल्या डावात २८६ धावांची मोठी आघाडी घेतली आहे.

वेस्ट इंडिजने पहिल्या डावात केवळ १६२ धावा केल्या होत्या, ज्याला प्रत्युत्तर देताना भारताने दमदार फलंदाजी केली. दुसऱ्या दिवशी के. एल. राहुल (१००), युवा यष्टिरक्षक ध्रुव जुरेल (१२५) आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा (नाबाद १०४) यांनी शानदार शतके झळकावत भारताला ४०० च्या पार नेले. कर्णधार शुभमन गिलनेही ५० धावांचे महत्त्वाचे योगदान दिले.

दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा रवींद्र जडेजा १०४ आणि वॉशिंग्टन सुंदर ९ धावांवर खेळत होता. तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाज मोठी धावसंख्या उभारतील अशी अपेक्षा असताना, कर्णधार शुभमन गिलने डाव घोषित करण्याचा धडाकेबाज निर्णय घेतला. त्यामुळे वेस्ट इंडिज संघाला दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरावे लागले.

भारतीय संघाने घेतलेल्या २८६ धावांच्या मोठ्या आघाडीमुळे आता वेस्ट इंडिजला ही कसोटी वाचवण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच वेस्ट इंडिजचे फलंदाज कशी झुंज देतात, यावर सामन्याचा निकाल अवलंबून असेल. या निर्णायक आघाडीमुळे भारताचा संघ तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी हा सामना जिंकण्याच्या प्रयत्नात असेल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा