
मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांचं पार्थिव मातोश्रीवर ठेवलं. त्यांच्या हातांचे ठसे घेतले. ते कशासाठी ? असा सवाल शिवसेना नेते रामदास कदम यांनी गोरेगावमध्ये नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे दसरा मेळाव्यातील भाषणातून उपस्थित केला. या आरोपाला उत्तर देताना उद्धव समर्थक आमदार अनिल परब यांनी रामदास कदमांच्या पत्नीनं १९९३ मध्ये स्वतः जाळून घेतलं असा दावा केला. अनिल परबांना उत्तर देण्यासाठी रामदास कदम यांनी तातडीने पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनिल परबांवर हल्लाबोल केला. चेलेचपाटे, चमच्यांना पुढे न करता उद्धव ठाकरेंनी बोलावं, असं खुलं आव्हान त्यांनी दिलं.
बाळासाहेब आणि त्यांच्या मृत्यूचा विषय मला काढायचा नव्हता. पण आता मी निर्णय घेतला आहे. बाळासाहेबांचं पार्थिव २ दिवस मातोश्रीवर का ठेवण्यात आलं, याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटणार असल्याचे रामदास कदम म्हणाले. मुख्यमंत्र्यांना पत्र देणार असंही ते म्हणाले.
'अनिल परब वकील आहेत. उच्चशिक्षित आहेत. चंद्रग्रहणाच्या रात्री १२ वाजता त्यांनी कोळीवाड्याच्या स्मशानभूमीत बकरा कापला. बकरा कापताना माझं आणि माझ्या मुलाचं नाव घेतलं. हे करण्यासाठी ते एका बिल्डरसोबत कारमधून बकरा घेऊन स्मशानभूमीत गेले होते. त्यावेळी दोन नंगे बाबा पण उपस्थित होते. तिथे उपस्थित असलेल्या काहींचं तसं म्हणणं आहे. तिथल्या स्थानिकांनी अनिल परब यांच्यासारख्याच कोणाला तरी पाहिलं. तसं त्यांचं म्हणणं आहे. परब यांच्यासारख्या शिक्षित व्यक्तीकडून अशी अघोरी कृत्यं होता कामा नयेत. तो प्रकार नेमका काय होता ?'; असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला.
रामदास कदम यांच्या पत्नीनं स्वत:ला जाळून घेतलेलं, असा आरोप उद्धव समर्थक आमदार अनिल परब यांनी केला. या आरोपाला रामदास कदमांनी उत्तर दिले. 'माझी पत्नी स्वयंपाकघरात जेवण करत होती. आमच्या खेडच्या घरी दोन स्टोव्ह होते. जेवण करताना तिच्या साडीनं पेट घेतला आणि भडका उडाला. त्यावेळी मी माझ्या पत्नीला वाचवलं. ते करताना माझे हात जळाले. आम्ही दोघेही त्यानंतर जसलोकमध्ये सहा महिने उपचार घेत होतो. तेव्हा बाळासाहेब ठाकरे आम्हाला भेटून गेले होते. आमची आस्थेने विचारपूस करुन गेले होते. या प्रकरणात माझी पत्नी त्यांच्या विरोधात अब्रु नुकसानीचा दावा दाखल करेल, असं रामदास कदम म्हणाले.
योगेश कदमांविषयी काय म्हणाले रामदास कदम ?
योगश कदम यांच्या आईच्या नावाने बार नाहीतर ऑर्केष्ट्रा होता, त्याचं परमिशन होतं. जो चालवत होता त्याचं अॅग्रीमेंट होतं. जेव्हा आम्हाला लक्षात आलं की तिथे एक मुलगी विक्षिप्त हावभाव करत होती तेव्हा आम्ही ते हॉटेल बंद केलं आहे. तुमच्यासारखे आम्हाला कोणाच्या बाबतीमध्ये स्मशानामध्ये बकरे कापण्याची गरज नाही. माझ्या पत्नीबद्दल जे काही काढलं ना त्यानं मला दु:ख आणि वेदना झाल्या आहेत. मी न्यायालयात गेल्याशिवाय राहणार नाही, तुला दाखवीन मी आता, असं म्हणत रामदास कदम यांनी उद्धव समर्थक आमदार अनिल परबांना इशारा दिला.
रामदास कदमांनी उपस्थित केलेले प्रश्न
बाळासाहेब होते त्यावेळी नेता म्हणून मला दसरा मेळाव्यांना बोलू दिले जात होते. पण बाळासाहेब गेल्यानंतर मला एखाद्या तरी मेळाव्यात बोलायला दिलं का ? बाळासाहेब असताना मी कुठे बसायचो मात्र नंतर मला कुठे बसवायचे ? हे अख्ख्या जगाने पाहिलं आहे. नंतर २०१४ ला मला मंत्रिपद दिलं तेव्हा त्यांचा नाऊईलाज होता, हे खातं कोणाला माहित होतं का ? मी या खात्याचा अभ्यास करून प्लास्टिकबंदीसारखा निर्णय घेत हे खातं उजेडात आणल्याचं सांगत रामदास कदम यांनी त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली.