Sunday, October 26, 2025
Happy Diwali

बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस 'मातोश्री'त का ठेवला?

बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस 'मातोश्री'त का ठेवला?

रामदास कदम यांचे दसरा मेळाव्यात खळबळजनक विधान; 'मृत्युपत्रात सही कोणाची होती?' चौकशीची मागणी

मुंबई: शिवसेनेचे (शिंदे गट) ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात एक अत्यंत खळबळजनक आणि गंभीर विधान करून राजकीय वर्तुळात मोठे वादळ निर्माण केले आहे. नेस्को सेंटरमध्ये झालेल्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणापूर्वी बोलताना कदम यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

रामदास कदम यांनी राज्याचे लक्ष वेधून घेणारी मागणी केली आहे. "बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीत का ठेवण्यात आला होता, याचा तपास करावा," अशी खळबळजनक विनंती त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. "मी हे विधान अत्यंत जबाबदारीने करत आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले.

दोन दिवसांच्या विलंबाचे रहस्य काय?

बाळासाहेबांच्या निधनाच्या वेळेबद्दल बोलताना रामदास कदम म्हणाले, "शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन कधी झाले आणि त्यांचा मृतदेह मातोश्रीवर किती दिवस ठेवण्यात आला होता, याची माहिती काढावी अशी माझी एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती आहे."

या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा यासाठी त्यांनी एक महत्त्वाचा पुरावा देखील समोर ठेवला. "शिवसेनाप्रमुखांवर उपचार करणारे डॉक्टर अजूनही आहेत. त्या डॉक्टरांना विचारून घ्या. दोन दिवस बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह उद्धव ठाकरे यांनी का ठेवला होता? त्यांचे अंतर्गत काय चालले होते?" असे थेट सवाल कदम यांनी उपस्थित केले आहेत.

'बाळासाहेबांच्या हाताचे ठसे' आणि 'मृत्युपत्र'

या प्रकरणाचे गूढ वाढवत कदम पुढे म्हणाले, "मी त्या काळात आठ दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलेलो आहे. मला सगळं कळत होतं. पण हे सारं कशासाठी करण्यात आलं? मला कोणीतरी सांगितलं की बाळासाहेबांच्या हातांचे ठसे घेण्यात आले होते. मग हे ठसे कशासाठी घेण्यात आले होते? नेमकं काय होतं? मातोश्रीमध्ये सगळी चर्चा चालू होती," असे धक्कादायक विधान रामदास कदम यांनी केले.

यापुढेही जाऊन, "बाळासाहेब ठाकरे यांचे मृत्युपत्र कोणी केले? हे मृत्युपत्र कधी झाले? त्यात सही कोणाची होती?" असे सवाल करत त्यांनी या सर्व गोष्टींची माहिती काढून सत्य बाहेर आणावे, अशी मागणी केली.

'तुम्ही सर्वांनाच संपवलं'

आपल्या भाषणाच्या अखेरीस रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर ज्येष्ठ नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. "तुम्ही आम्हाला काय शिकवता? शिवसेना आम्ही मोठी केली. आम्ही तुरुंगात गेलो. तुम्ही आम्हालाच संपवताय. तुम्ही मनोहर जोशी, गजानन कीर्तिकर, दिवाकर रावते, रामदास कदम यांना संपवले. आता उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे लागले आहेत," असा हल्लाबोल कदम यांनी केला. रामदास कदम यांनी केलेल्या या खळबळजनक मागण्यांमुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतरच्या घडामोडींवर आता राज्यभर चर्चा आणि उलटसुलट प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment