Thursday, October 2, 2025

RSS : कोण शत्रू, कोण मित्र ? हे पहलगामच्या घटनेने शिकवले'

RSS : कोण शत्रू, कोण मित्र ? हे पहलगामच्या घटनेने शिकवले'

नागपूर : ऐतिहासिक रेशीमबाग मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव झाला. या उत्सवात बोलताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी पहलगाम येथे घडलेल्या घटनेचा उल्लेख केला. कोण शत्रू, कोण मित्र ? हे पहलगामच्या घटनेने शिकवले, असे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले. ते विजयादशमी उत्सवात उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने यंदा नागपूरमध्ये भव्य विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात बोलताना पहलगामच्या घटनेबाबत सरसंघचालक स्पष्ट बोलले.

शेजाऱ्यांशी तसेच जगातील इतर देशांशी मैत्रीचे, सलोख्याचे, विश्वासाचे नाते असलेच पाहिजे. पण देशहिताच्या आड येणाऱ्याला ठेचले पाहिजे. तिथे मैत्रीचे नाते किंवा शेजारधर्म आडवा आलेला चालणार नाही. देशाचे रक्षण करणे, देशाच्या प्रगतीसाठी योगदान देणे हे प्रथम कर्तव्य आहे आणि असलेच पाहिजे; असेही सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले.

पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी सीमेपलिकडून आलेल्या अतिरेक्यांनी २६ जणांची हत्या केली. धर्म विचारुन हत्या करण्यात आली. हिंदू पर्यटक होते म्हणून त्यांची हत्या केली गेली. या घटनेमुळे देशाला धक्का बसला. सर्वत्र शोकाकुल वातावरण निर्माण झाले. या घटनेच्या सूत्रधारांपर्यंत पोहचले पाहिजे आणि त्यांना धडा शिकवला पाहिजे अशी भावना देशभर निर्माण झाली. भारत सरकारने विचारपूर्वक आणि व्यवस्थित नियोजन करुन कारवाई केली. चोख प्रत्युत्तर दिले. या संपूर्ण कालावधीत देशभर भारताच्या नेतृत्वाच्या दृढनिश्चयाचे, सशस्त्र दलांच्या शौर्याचे आणि लढाऊ बाण्याचे तसेच समाजाच्या दृढनिश्चयाचे आणि एकतेचे हृदयस्पर्शी दृश्य दिसले.

पहलगामच्या घटनेने देशाला शिकवले की आपण सर्वांशी मैत्रीपूर्ण असलो तरी, आपण स्वतःच्या सुरक्षेबद्दल जागरूक राहिले पाहिजे. कोणता देश आपला मित्र आहे आणि कोणता आपला शत्रू आहे हे समजून घेता आले. या मिळालेल्या शिकवणीचा देशहितासाठी सुयोग्य वापर होणे महत्त्वाचे असल्याचे सरसंघचालक म्हणाले.

सरसंघचालक जेन झी अर्थात तरुणी पिढीच्या मुद्यावरही बोलले. देशाचे धोरण ठरवताना वास्तवाचे भान राखणे, भविष्याचा वेध घेणे आवश्यक असते. किती व्यावहारिक असावे आणि किती भावनिक रहावे याचा समतोल राखावा लागतो. प्रत्येकवेळी जनतेला वाटले म्हणून धोरण ठरवले असे होत नाही. जनभावनेचा आदर व्हायला हवा. पण वास्तवाचे भान पण जपले पाहिजे. क्रांती करणे म्हणजे अस्थिरता निर्माण करणे नव्हे. अस्थिरता असेल तर देशाचे भले होणार नाही पण देशाच्या शत्रूचा फायदा होईल. ही बाब सर्वांनी समजून घ्यायला हवी असे सरसंघचालक म्हणाले. श्रीलंका आणि नेपाळमधल्या स्थितीचा त्यांनी भाषणात उल्लेख केला. शेजारी देशांमधील घडामोडी हा चिंतेचा विषय असल्याचे ते म्हणाले.

याआधी परंपरेनुसार विजयादशमी उत्सवाची सुरुवात शस्त्रपूजा आणि संघाच्या शिस्तबद्ध संचलनाने झाली. सकाळी ७:३० वाजता कार्यक्रम सुरू झाला. सरसंघचालकांनी शस्त्रपूजा केली. योग प्रात्यक्षिके, नियुध्द, घोष आणि प्रदक्षिणा असे सांस्कृतिक कार्यक्रम झाले. यंदाच्या विजयादशमी उत्सवासाठी २१ हजारांपेक्षा जास्त संघ स्वयंसेवक संचलनात सहभागी झाले. यानंतर मान्यवरांची भाषणं झाली. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यानंतर सरसंघचालकांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

माजी राष्ट्रपतींनी त्यांच्या आयुष्यावर दोन डॉक्टरांचा मोठा प्रभाव असल्याचे सांगितले. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पहिले सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे ते दोन डॉक्टर आहेत, असे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले. त्यांनी संघाच्या शिस्तबद्ध कार्याचे कौतुक केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशसेवेत मोठे योगदान दिल्याचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले. राष्ट्र उभारणीत संघाने मोलाची भूमिका बजावली असल्याचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितले.

संघाचा विजयादशमी उत्सव

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने यंदा नागपूरमध्ये भव्य विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. नागपूरच्या ऐतिहासिक रेशीमबाग मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव झाला. या उत्सवाला यंदा विशेष अतिथी म्हणून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित होते. चावर माजी राष्ट्रपती कोविंद, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संघातील इतर मान्यवर आहेत. विशेष म्हणजे गडकरी आणि मुख्यमंत्री फडणवीस हे दोघे मूळचे संघाचे स्वयंसेवक असल्यामुळे विजयादशमी उत्सवासाठी संघाच्या गणवेशात मंचावर उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा