मुंबई: आशिया कप २०२५ संपल्यानंतर आता महिला क्रिकेट महाकुंभाची सुरूवात होत आहे. आयसीसी महिला वनडे वर्ल्डकपची सुरूवात ३० सप्टेंबर म्हणजेच उद्यापासून होत आहे. फायनलचा सामना २ नोव्हेंबरला होईल. घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा भारतीय महिला संघाला होणार आहे. भारतीय महिला संघ मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध वनडे वर्ल्डकप २०२५मधील पहिला सामना खेळण्यास उतरतील. संघाचे लक्ष्य हे ४७ वर्षांनी पहिला आयसीसीचा खिताब जिंकणे आहे.
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या हरमनप्रीतच्या नेतृत्वातील संघाला घरच्या मैदानांवर खेळण्याचा अनुभव आहे तसेच सध्या महिला संघ जबरदस्त फॉर्मात आहे. त्यामुळे याचा ते फायदा नक्की उचलतील. हा १३वा महिला क्रिकेट वर्ल्डकप आहे आणि भारतात १२ वर्षांनी आयोजित होत आहे. स्पर्धेत २८ सामने खेळले जातील. यातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना ५ ऑक्टोबरला रंगणार आहे. स्पर्धेचा सेमीफायनल आणि संभाव्य फायनल भारतात खेळवला जाईल.
भारतीय संघाचा फॉर्म उत्साहजनक आहे. सध्या संघाने इंग्लंडला वनडे आणि टी-२० मालिकेत हरवले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाची मालिका खंडित केली. कर्णधार हरमनप्रीत मोठ्या स्पर्धंमध्ये चांगली कामगिरी करते. तिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक आणि इंग्लंडविरुद्ध शतक ठोकले होते. दुखापतीतून सावरलेली जेमिमाही फॉर्ममध्ये आहे.
स्पर्धेत सामील संघ
ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांग्लादेश आणि पाकिस्तान
विश्वचषक स्पर्धेचे स्वरूप:
या स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी आहेत.
'राउंड रॉबिन' (Round Robin) फॉरमॅटनुसार प्रत्येक संघ एकमेकांशी एक-एक सामना खेळेल.
गुवाहाटी, इंदूर, विशाखापट्टणम आणि नवी मुंबई (भारत) तसेच कोलंबो (श्रीलंका) या पाच मैदानांवर सामने खेळवले जातील.
पॉइंट्स टेबलमधील अव्वल ४ संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
स्पर्धेचा अंतिम सामना २ नोव्हेंबर २०२५ रोजी नवी मुंबई किंवा कोलंबो येथे होणार आहे.