
छत्रपती संभाजीनगर : फुलंब्री तालुक्यातील आळंद गावात घडलेल्या दुर्दैवी घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एका विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी तिच्या पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
शुक्रवारी (२६ सप्टेंबर) रमाबाई जमधडे यांनी शेतातील विहिरीत उडी घेत जीवन संपवलं. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या पतीने, विलास रामभाऊ जमधडे (वय ४३), पत्नीच्या अंत्यसंस्कारानंतर विहिरीजवळ कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. त्यांनी मृत्यूपूर्वी व्हॉट्सअॅप ग्रुपवर मेसेज करून आपल्या टोकाच्या निर्णयाची माहिती दिली होती.
संदेशात त्यांनी लिहिले होते की, "माझ्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे पीक कर्ज आहे. काल माझ्या पत्नीने कर्जाच्या ओझ्यामुळे आत्महत्या केली आणि मीही त्याच कारणामुळे आत्महत्या करत आहे. माझी शेवटची इच्छा अशी आहे की माझी मुलं आळंद गावातूनच आपलं शिक्षण पूर्ण करावं. सुमित, अमित मला माफ करा."
मिळालेल्या माहितीनुसार, जमधडे हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांच्या नावावर केवळ ४३ गुंठे जमीन असून शेतीतून पुरेसं उत्पन्न न मिळाल्याने ते पत्नीसमवेत मजुरी करून संसार चालवत होते. मात्र त्यांच्यावर बँक, सोसायटी आणि खासगी सावकारांचे मोठे कर्ज होते. पत्नी रमाबाई यांच्यावरदेखील बचत गटाचे कर्ज असल्याचे उघड झाले आहे.
गावकऱ्यांनी सांगितले की, विलास यांनी आत्महत्येपूर्वी शेतात जाऊन संदेश पाठवला. मात्र शेत गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असल्याने ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचेपर्यंत त्यांनी गळफास घेतला होता. वडोद बाजार पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून पोस्टमार्टमसाठी फुलंब्री उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.
या दुहेरी आत्महत्येमुळे आळंद परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगी आणि दोन अविवाहित मुलं असा परिवार आहे.