
दुबई: क्रिकेटप्रेमींसाठी आज मोठा दिवस आहे. आशिया कप २०२५ चा अंतिम सामना पारंपरिक प्रतिस्पर्धक भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होत आहे. भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता हा सामना सुरू होईल. अंतिम विजेतेपदासाठी त्यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.आशिया चषकातील १७ हंगाम आणि ४१ वर्षांनंतर हा योगायोग जुळून आला आहे
भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. भारतीय संघ आशिया कपमध्ये आतापर्यंत एकही सामना हरला नाही. सुपर-४ मध्ये सुद्धा भारतीय संघाने विजयाचा आलेख उंचावला, गुणतालिकेत भारतीय संघाचा दबदबा स्पष्ट दिसला. सलामीवीर आणि मधल्या फळीतील फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे.
सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने शुक्रवारी सुपर-४ मधील अखेरच्या सामन्यात श्रीलंकेला हरवले. भारताने सुरुवातीला फलंदाजी केली. श्रीलंकेच्या संघाने सुद्धा भारताला कडवी झुंज दिली. दरम्यान २० षटकांत भारताने २०२ धावांचा डोंगर उभारला. पण त्यांना लक्ष्य गाठताना दमछाक झाली. सुपर ओव्हरमध्ये भारताने श्रीलंकला पराभूत केले. या विजयासह भारतीय संघाने आशिया कप २०२५ मध्ये विजयी घोडदौड कायम ठेवली. भारतीय संघाला या सामन्यात जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. पण अंतिम सामन्यात जेव्हा भारत पाकिस्तान संघ आमने-सामने आले आहेत, तेव्हा पाकिस्तानचे पारडे जड राहिलं आहे.
पाकिस्तानला लोळवण्याची सुवर्णसंधी
पहलगाम हल्ल्यानंतर आशिया कपवर भारताने बहिष्कार घालण्याची मागणी होत होती. पण भारत नसला तर व्यावसायिक मोठे नुकसान होते. त्यामुळे हे सामने खेळवले जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. गेल्या दोन सानन्यांनंतर भारतात कुठेही मोठा जल्लोष दिसला नाही. मात्र भारताकडे आज पाकिस्तानला पुन्हा लोळवण्याची संधी चालून आली आहे. यापूर्वीच्या दोन सामन्यात पाक संघाला नामोहरम केले, आता अंतिम सामन्यात पाक संघाला त्याच्या गर्वासह लोळवा असा संताप भारतीय चाहत्यांचा आहे.
इंडिया 'सुपर ४ गुणतालिकेत सर्वांत आघाडीवर आहे. आशिया चषकात ६ गुणांसह भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर आहे. तर दोन सामने जिंकणारा पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता अंतिम सामन्यासाठी पुन्हा पाकिस्तानसोबत भारताचा सामना होणार आहे. आशिया कपमध्ये हे दोन्ही संघ तिसऱ्यांदा एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.