
नवी दिल्ली : बहुचर्चित आशिया कप २०२५ (Asia Cup 2025) स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोणते दोन संघ आमनेसामने येतील हे आता स्पष्ट झाले आहे. भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात उद्या रविवारी, म्हणजेच २८ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर अंतिम सामना खेळवला जाईल. आशिया कपच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. आशिया कपची सुरुवात १९८४ साली झाली. सध्याचा आशिया कप हा स्पर्धेचा १७ वा हंगाम आहे. पहिला हंगाम २०१६ मध्ये टी-२० स्वरूपात आणि दुसरा २०२२ मध्ये खेळवण्यात आला होता. सध्याचा हंगाम हा तिसरा हंगाम आहे ज्यामध्ये टी-२० स्वरूप खेळवण्यात आले आहे.
IND vs PAK : पहिल्या आशिया कपचा अंतिम सामना १९८४ साली युएईमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला होता. त्यात भारताने विजय मिळवला होता. दुसरा आशिया कप १९८६ मध्ये श्रीलंकेत खेळला गेला होता. श्रीलंकेने पाकिस्तानला हरवून विजेतेपद पटकावले. १९८८ मध्ये बांगलादेशमध्ये झालेल्या तिसऱ्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला हरवले. १९९० मध्ये भारतात झालेल्या चौथ्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला हरवले. तर १९९५ मध्ये भारताने श्रीलंकेला हरवून युएईमध्ये पाचवा आशिया कप जिंकला. १९९७ मध्ये श्रीलंकेत झालेल्या सहाव्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारताला हरवले.
IND vs SL: अर्शदीपची कमाल, सुपरओव्हरमध्ये भारताचा श्रीलंकेवर विजय
२००० साली बांगलादेशमध्ये आशिया कपची सातवी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती. पाकिस्तानने श्रीलंकेला हरवून ही स्पर्धा जिंकली होती. २००४ मध्ये श्रीलंकेत झालेल्या आठव्या आशिया कपमध्ये श्रीलंकेने भारताला हरवून विजेता बनला होता. २००८ साली आशिया कपची नववी आवृत्ती पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आली होती. तेव्हा भारताला हरवून श्रीलंकेने विजय मिळवला. तर २०१० साली आशिया कपची दहावी आवृत्ती श्रीलंकेत खेळवण्यात आली. भारताने श्रीलंकेला हरवून विजेतेपद पटकावले. २०१२ मध्ये आशिया कपची अकरावी आवृत्ती बांगलादेशात झाली. बांगलादेशला हरवून पाकिस्तान विजेता ठरला.
त्यानंतर २०१४ साली बांगलादेशमध्ये आशिया कपची बारावी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती. पाकिस्तानला हरवून श्रीलंकेने विजेतपद पटकावले. २०१६ मध्ये मध्ये आशिया कप (१३ वी आवृत्ती) पहिल्यांदाच टी-२० स्वरूपात खेळवण्यात आला. बांगलादेशमध्ये झालेल्या स्पर्धेत भारत विजेता ठरला होता.पराभूत संघ बांगलादेश होता. आशिया कपचा १४ वा हंगाम २०१८ मध्ये युएईमध्ये एकदिवसीय स्वरूपात आयोजित करण्यात आला होता. भारताने बांगलादेशला हरवून विजय मिळवला होता. २०२२ मध्ये, आशिया कपचा दुसरा हंगाम (१५ वा हंगाम) युएईमध्ये टी-२० स्वरूपात आयोजित करण्यात आला होता. श्रीलंका गतविजेता होता, त्याने अंतिम सामन्यात पाकिस्तानला हरवले. २०२३ चा आशिया कप (१६ वी आवृत्ती) पाकिस्तान आणि श्रीलंका यांनी संयुक्तपणे आयोजित केला होता. अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव केला.
आशिया कपमध्ये भारत हा सर्वात यशस्वी संघ आहे, त्याने आठ वेळा विजेतेपद जिंकले आहे. सहा विजेतेपदांसह श्रीलंका दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात यशस्वी संघ आहे. पाकिस्तानने दोनदा आशिया कप जिंकला आहे.