Wednesday, September 24, 2025

Rain Update : मराठवाड्यात पावसाचा कहर, राज्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा

Rain Update : मराठवाड्यात पावसाचा कहर,  राज्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा

सोलापूर: मागील काही दिवसांपासून मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात पावसाने कहर केला आहे. सातत्याने सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. सीना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्यामुळे सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याची व्यवस्था केली आहे. दरम्यान,संपूर्ण राज्यात पावसाचा जोर शुक्रवारपासून पुन्हा वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या कालावधीत अनेक भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. काही भागात कमी कालावधीत अधिक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

दुसरीकडे सोलापूर-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गवरील वाहतूक देखील बंद करण्यात आल्याची माहिती आहे. अशातच, सोलापूर रेल्वे विभागातील सीना नदीवरील दोन रेल्वे पूल ओलांड्यांमध्ये पाण्याची पातळी धोक्याच्या सीमारेषेवर पोहोचली आहे. सुरक्षित रेल्वे वाहतुकीसाठी या मार्गांवरील सर्व रेल्वे गाड्यांचा वेग ३० किमी प्रतितास इतका कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जायकवाडी आणि माजलगावच्या धरण क्षेत्रात सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे गोदावरी नदी धोक्याच्या पातळीवर असून गोदावरी आणि सिंदफणा नदीलगतच्या गावांमधील पूर परिस्थिती वाढण्याचा धोका आहे.

या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. बचावकार्य आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. नागरिकांनी सतर्क राहावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात येत आहे.

मराठवाड्यात दोन शाळांसह ३१५ हून अधिक घरांची पडझड झाल्याची नोंद करण्यात आली आहे. १५० हून अधिक जनावरांच्या मृत्यूचीही प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्याचप्रमाणे या भागातील साडेसात हजार गावांपैकी ११४० गावांमध्ये शेतात पाणी शिरल्याने दोन लाख ५५ हजार १४९ शेतकऱ्यांची दोन लाख २२ हजार १६४ हेक्टरावरील पिके बाधित झाली आहेत.

पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीने थैमान घातले असून बुलढाणा आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांना त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >