
उद्घाटनाची तयारी अंतिम टप्प्यात
मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन लवकरच होणार असून, त्यापूर्वीच विमान कंपन्यांनी येथे सेवा सुरू करण्याची तयारी केली आहे. इंडिगो एअरलाईन्सपाठोपाठ आता एअर इंडियानेही या विमानतळावरून मोठी भरारी घेण्याची घोषणा केली आहे.
मंगळवारी एअर इंडियाने जाहीर केले की, कंपनी २०२६ च्या मध्यापर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज ५५ विमानांचे उड्डाण करेल. २०२६ च्या हिवाळ्यापर्यंत ही संख्या वाढवून दररोज ६० विमाने उड्डाण करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. यात आंतरराष्ट्रीय उड्डाणांचाही समावेश असेल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन येत्या ३० सप्टेंबर रोजी होण्याची दाट शक्यता आहे. सिडको युद्धपातळीवर विमानतळाची कामे पूर्ण करत आहे. उद्घाटनाची तयारी अंतिम टप्प्यात असतानाच एअर इंडियाने ही माहिती दिली आहे.
या विमानतळावरून उड्डाण सुरू करणारी पहिली विमान कंपनी इंडिगो एअरलाईन्स ठरली आहे. इंडिगोने सुरुवातीपासूनच दररोज १५ हून अधिक शहरांसाठी १८ उड्डाणे करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. विमानतळ सुरू झाल्यावर दररोज एकूण ७९ उड्डाणे होणार आहेत. यापैकी १४ उड्डाणे आंतरराष्ट्रीय असतील. यापूर्वी, २९ डिसेंबर २०२४ रोजी इंडिगोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिले चाचणी उड्डाण यशस्वीपणे पूर्ण केले होते.
जागतिक केंद्र बनण्याचे उद्दिष्ट
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रवासी आणि मालवाहतूक या दोन्हीसाठी एक प्रमुख जागतिक वाहतूक केंद्र म्हणून विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग्जचे सीईओ अरुण बन्सल यांनी या विमानतळाला यशस्वी आणि धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे बनवण्याची वचनबद्धता व्यक्त केली आहे. एअर इंडियाच्या या विस्तारामुळे जागतिक विमान वाहतुकीच्या क्षेत्रात भारताचे स्थान अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा आहे. हे विमानतळ आपल्या धोरणात्मक स्थानामुळे भारताला उर्वरित जगाशी जोडण्याचे एक महत्त्वाचे केंद्र ठरेल.