Tuesday, September 23, 2025

Dharashiv Rain : धाराशिवमध्ये भयावह परिस्थिती! चिखलाच्या वेढ्यात घरं अन् मुलांची वह्या-पुस्तके पाण्यात; मुलं निशब्द तर आई ढसाढसा रडत म्हणाली...

Dharashiv Rain : धाराशिवमध्ये भयावह परिस्थिती! चिखलाच्या वेढ्यात घरं अन् मुलांची वह्या-पुस्तके पाण्यात; मुलं निशब्द तर आई ढसाढसा रडत म्हणाली...

धाराशिव : दुष्काळाने होरपळणारा मराठवाडा (Marathwada Rain) आता पावसाच्या तडाख्याने अक्षरशः हैराण झाला आहे. ओल्या दुष्काळाने या भागाचं जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक ठिकाणी पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. धाराशीव, बीड आणि जालना जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातलं आहे. ज्या मराठवाड्याला काही वर्षांपूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी रेल्वेने टँकरद्वारे पाणी पोहोचवावं लागलं होतं, त्याच मराठवाड्यात आता हेलिकॉप्टरच्या मदतीने नागरिकांना वाचवण्याची वेळ आली आहे. इतका पाऊस झालाय की रस्ते बंद, पूल वाहून गेले आणि शेतं जलमय झाली आहेत. हवामान खात्याच्या माहितीनुसार, यावर्षी १ जूनपासून २२ सप्टेंबरपर्यंत मराठवाड्यात सरासरीच्या तब्बल १२४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. साधारणपणे या काळात ६०४ मिमी पाऊस अपेक्षित असतो, परंतु आतापर्यंत ७४७ मिमी पाऊस झाला आहे. फक्त सप्टेंबर महिन्यातच सरासरीपेक्षा १६५ टक्के अधिक पाऊस पडल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे.

नागरिकांना हेलिकॉप्टरने वाचवण्याची वेळ

सलग बरसणाऱ्या पावसाने (Dharashiv Flood) गावोगावी नद्या-नाल्यांना पूर आला असून, अनेक घरांना पाण्याचा वेढा बसला आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, नागरिकांना स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी घरांच्या छतावर आसरा घ्यावा लागत आहे. पूराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी प्रशासनाने हेलिकॉप्टरचा अवलंब केला आहे. अनेक ठिकाणी छतावर अडकलेल्या कुटुंबांना हवाईमार्गे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, धाराशिवमधील आंबी गावात मुकेश गटकळ यांच्या घरात अचानक पूरपाणी शिरल्याने त्यांचा संसार उघड्यावर पडला. या घटनेदरम्यान गटकळ कुटुंबातील महिलेची व्यथा डोळ्यांत अश्रू आणणारी ठरली. "संपूर्ण घर पाण्याखाली गेलं, जगण्यासाठी आता देवच आधार," असे सांगताना त्यांच्या डोळ्यातील अश्रूंनी पूरग्रस्तांची हतबलता स्पष्टपणे दिसून आली. प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू असून, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. मात्र अजूनही अनेक गावांमध्ये पाणी ओसरण्याची चिन्हे दिसत नाहीत.

घरात चिखल, पुस्तके भिजली, कुटुंब हतबल

धाराशिव जिल्ह्यातील आंबी गावात मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पूरपाणी घुसले आहे. मुकेश गटकळ यांच्या घरात तर परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. घरभर चिखलाचा खच तयार झाला असून, सर्व घरगुती साहित्य अस्ताव्यस्त अवस्थेत पाण्यात भिजून पडले आहे. सर्वात वेदनादायक म्हणजे, घरातील लहान मुलांच्या वह्या-पुस्तकांचाही चिखल आणि पावसाच्या पाण्यामुळे नाश झाला आहे. अभ्यासासाठी आवश्यक असलेले साहित्य उद्ध्वस्त झाल्याने कुटुंब अधिकच चिंतेत आहे. घरातील महिलेनं परिस्थिती सांगताना डोळ्यात अश्रू दाटून आले. "संपूर्ण संसार उघड्यावर पडलाय, मायबाप सरकारनं आता तरी मदत करावी," असे आवाहन गटकळ कुटुंबियांनी प्रशासनाला केले आहे. सध्या प्रशासन आणि बचाव पथकांकडून पूरग्रस्तांना मदतकार्य सुरू असून, अन्नधान्य व तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था केली जात आहे. मात्र नागरिकांना पुन्हा उभं राहण्यासाठी शासनाच्या ठोस मदतीची गरज असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे.

धाराशिवच्या पूरस्थितीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचे लक्ष

धाराशिव जिल्ह्यात भूम आणि परंडा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झाली आहे. काल अनेक गावांमध्ये नागरिक अडकून पडले होते, तर काही भागांत पूरपाणी घरामध्ये शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या संपूर्ण परिस्थितीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः लक्ष ठेवून आहेत. सकाळपासून सुरू असलेल्या बचाव व मदतकार्यातील घडामोडींवर ते सातत्याने माहिती घेत आहेत. विशेषतः भूम-परंडा भागातील रेस्क्यू ऑपरेशनबाबत अजित पवार सतत संपर्कात आहेत. त्यांनी या भागातील माजी आमदार राहुल मोटे यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून अडकलेल्या नागरिकांची स्थिती आणि मदतकार्यातील प्रगतीची चौकशी केली. दरम्यान, प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन पथकांकडून सतत मदतकार्य सुरू आहे. हेलिकॉप्टर व बोटींच्या सहाय्याने अनेकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून, अजित पवारांनी नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशा सूचना स्थानिक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

विदर्भ-मराठवाड्यात पुन्हा पावसाची शक्यता

राज्यात अजूनही पावसाची लाट थांबलेली नाही. हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे. २६ सप्टेंबर रोजी विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व व दक्षिणेकडील भागांमध्ये दुपारनंतर पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याचबरोबर, २७ सप्टेंबर रोजी पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याची शक्यता आहे. यावेळी केवळ विदर्भ-मराठवाडाच नाही तर खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत ढगफुटीसदृश पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देत प्रशासनाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पावसामुळे नद्यांमध्ये पाणीपातळी वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून, नीचांगी भागातील नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी हा पाऊस वरदान ठरण्याची शक्यता असली तरी, मुसळधार पावसामुळे उभी पिके व नुकसानाची भीतीही व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment