Monday, September 22, 2025

Irfan Pathan On Ind vs Pak Asia Cup 2025 : साहिबजादाची नापाक हरकत! गोळीबाराची ॲक्शन पाहून इरफान पठाण Live कॉमेंट्रीमध्ये म्हणाले…

Irfan Pathan On Ind vs Pak Asia Cup 2025 : साहिबजादाची नापाक हरकत! गोळीबाराची ॲक्शन पाहून इरफान पठाण Live कॉमेंट्रीमध्ये म्हणाले…

आशिया चषक २०२५ च्या सुपर-४ फेरीत पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान आमनेसामने आले. या रोमांचक सामन्यात भारताने दमदार खेळ करत ६ विकेट्सने पाकिस्तानवर मात केली. मात्र, सामन्यादरम्यान मैदानावर एका घटनेमुळे वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहानने अर्धशतक ठोकल्यानंतर बॅट हातात घेऊन AK-४७ रायफलप्रमाणे गोळीबार करण्याची ॲक्शन केली. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला असून भारतीय चाहत्यांनी आणि तज्ज्ञांनी त्याच्यावर जोरदार टीका केली आहे. अनेकांनी या कृतीला "नापाक हरकत" असे संबोधले आहे. विशेष म्हणजे, जेव्हा फरहानने ही ॲक्शन केली, तेव्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये भारतीय संघाचा माजी स्टार ऑलराउंडर इरफान पठाण उपस्थित होता. त्यावेळी प्रतिक्रिया देताना पठाण म्हणाला, "भारताची फलंदाजी अजून बाकी आहे... भारतीय फलंदाज मैदानात आल्यावर तेही सेलिब्रेशन करतील." भारताच्या विजयासह हा सामना आणखी एका वादग्रस्त घटनेमुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर भारतीय फॅन्सकडून पाकिस्तानच्या खेळाडूवर जोरदार हल्लाबोल होत आहे.

पाकिस्तानवर तुटून पडला भारतीय ओपनर

आशिया चषक २०२५च्या सुपर-४ सामन्यात भारताने १७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग जबरदस्त आत्मविश्वासाने सुरू केला. सलामीला आलेल्या शुभमन गिल आणि अभिषेक शर्माने पाकिस्तानच्या गोलंदाजांवर अक्षरशः धडक मारली. अभिषेक शर्माने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत भारतीय डावाला जोरदार सुरुवात दिली. चौकार-षटकारांच्या फटकारांनी स्टेडियम गजबजून गेले होते. फक्त नऊ षटकांत भारताने शतक पूर्ण करत पाकिस्तानवर वर्चस्व गाजवलं. अभिषेकने केवळ २४ चेंडूत अर्धशतक साकारलं आणि अखेरीस ३९ चेंडूत ७४ धावांची तुफानी खेळी साकारली. त्याच्या डावात ६ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे भारताचा विजय अधिकच सोपा झाला आणि प्रेक्षकांनीही या दमदार खेळीला दाद दिली.

भारत-पाकिस्तानचा सामना कसा राहिला?

भारताने पाकिस्तानवर ६ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर १७२ धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र, भारतीय सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात देत हे लक्ष्य सहज गाठलं. अभिषेक शर्माने फक्त ३९ चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकारांसह ७४ धावांची तुफानी खेळी केली. तर शुभमन गिलने ४७ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिलं. या जोडीने १०५ धावांची भागीदारी करीत विजयाचा पाया भक्कम केला. त्यानंतर संजू सॅमसन आणि तिलक वर्माने विजयी सोपस्कार पूर्ण करत भारताला सहज विजय मिळवून दिला. पाकिस्तानकडून साहिबजादा फरहानने ५८ धावांची सर्वाधिक खेळी केली. तर फखर जमान (१५), सईम अयुब (२१), मोहम्मद नवाज (२१), सलमान आगा (१७) आणि फहीम अश्रफ (२०) यांनी छोटेखानी योगदान दिलं. भारताच्या गोलंदाजीत शिवम दुबेने दोन गडी बाद केले, तर हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

Comments
Add Comment