
मनस्विनी : पूर्णिमा शिंदे
सोशल मीडियावर हल्ली एआयचे भयंकर वादळ घुणघुणत आहे. या मोहाला अनेक तरुण पिढी बळी पडत आहेत. आपण कसे दिसतो? यापेक्षा आपण कसे वागतो? याला जास्त महत्त्व दिले जात आहे. हे जीवनाचे गांभीर्यच लोक विसरू लागले आहेत. या सगळ्या घडणाऱ्या घटनांचा परिणामांची आताच्या पिढीला गंमत वाटते ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे.
डिजिटल युगात डिजिटल मार्केटिंग, डिजिटल डिझाईन, डिजिटल प्रिंटिंग, डिजिटल थांबा कुठेतरी आणि करा “डिजिटल फास्टिंग” ही वेळ आली आहे आता म्हणण्याची. माणूस हा पर्यावरणप्रेमी असला पाहिजे. पर्यावरणपूरक असला पाहिजे आणि सर्वांनी पर्यावरणाचे जतन, संवर्धन केले पाहिजे! असे किती जणांना वाटते! किती जण यासाठी झटत आहेत? आपण काय काय करतो? सकाळपासून संध्याकाळपर्यंत ही दिनचर्या लक्षात घेतली पाहिजे. यासाठी स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. स्वतःलाही काही नियम घातले पाहिजेत. ते आपल्या भल्यासाठीच असतील. सोशल मीडियाच्या अतिरिक्त वापरामुळे मन, मेंदू, डोळे यावर अतिशय घातक परिणाम होतात. भयंकर असाध्य रोग निर्माण होतात. निद्रानाश, मणक्याचे विकार, मेंदूचे विकार, बैठ्या कामांमुळे हृदयावर ताण त्याशिवाय सामाजिक, कौटुंबिक आणि वैयक्तिक नातेसंबंधांच्या तक्रारी देखील वाढत आहेत. सोशल मीडियाच्या अतिरिक्त वापरामुळे माणसं मोहाला बळी जाऊन कुठेतरी फसत आहेत. हे जाळ पसरलेले आहे. नेटच्या या महाभयंकर जाळ्यामुळे कोणत्याही गोष्टीचा अतिवापर करणं हे अयोग्यच आहे. ऑनलाईन सगळे डिजिटल; परंतु आपणही त्याचा किती वापर करावा आणि अतिरिक्त वापर टाळावा. हे आपण स्वतःने ओळखायला हवं.
प्रदूषणाचे काही नियम पाळूया. प्रदूषण हे ध्वनी, पाणी, वायू याबरोबरच सर्व गोष्टींत आहे. परवा म्हणे डीजे लावला आणि नवरदेवाचा मृत्यू झाला. स्वतःच्या वरातीमध्येच ध्वनी प्रदूषण वाढले. रक्तदाब वाढला आणि मृत्यू हार्टअटॅकने झाला. किती वाहवत जाल?
गणेशोत्सवामध्ये गणपती विसर्जनाच्या वेळी मोठमोठ्या गणपतींचे विसर्जन केले जाते. गणपतींच्या मूर्तींमध्येसुद्धा आपल्याला चढाओढ पाहायला मिळते. या समाजात माणूस माणूस राहिला नाही की माणूसपण. माणुसकी हरवली आहे आणि देवाचाही तुम्ही बाजार मांडला आहे का? देवाची भक्ती करा ना करायची तर दीड फुटांची ही मूर्ती असतेच. त्यातही देव आहेच ना! मग देवाची भक्तीच तो काही म्हणत नाही. पण आपण सुद्धा नियम, शर्ती, अटींना सामोरे जाऊन मंडळांची अरेरावी, अपमान, अवहेलना किती सहन करत असतो? किती वाहत जाल आणि शेवटी मनी नाही भाव देवा मला पाव. नाच गाणं जागरण ठीक आहे पण स्पर्धेचं काय? माणूस पण जपा इतकच! संतांनी भक्ती केली. “समतेच्या तटावर ममतेचे मंदिर बांधलं” संतांनी ती केलेली भक्ती ही समतेची होती ना! इथं मात्र देव कोपेपर्यंत तुम्ही भेदभाव करता गरीब, श्रीमंत, उचनीच, लहान मोठा हा भेदभाव काय कामाचा? खरंतर माणूसपण जपा, पण नाही ! देव विसर्जन केल्यानंतर समुद्राच्या किनारी आलेली मूर्ती. त्या भंग झालेल्या मुर्त्यांचे हात, पाय, तोंड, कधी गेलात का उचलायला? बघायला, विसर्जित झालेल्या मूर्ती यांचं किती पाप होते. भक्तीभावाने पुजलेल्या देवाला आपण असं वागवतोय? काय माणूसपण आहे आपल्यात सांगा?
गोपाळकाला, गोकुळाष्टमी, दहीहंडी काय हो श्रीकृष्णाने काही दहा थरांचे गोविंदे केले होते हा? दहा थर रचले होते का? इथे ईर्षा, स्पर्धा, चढाओढ आलीच आणि ती किती जीवन आयुष्य गिळंकृत करणारे. विश्वविक्रमी ठरण्यासाठी पैसा बक्षिसे तुम्ही किती किती आतताईपणा! किती वाहवत जाल सांगा ना. नवरात्र उत्सव का साजरा करतात? ज्या महिषासुराचा वध केला त्या महिषासुरमर्दिनीचा उत्सव. देवी देवतांच्या नावावर जेव्हा जागरण केली जातात. नवरात्रोत्सवात नऊ दिवस देवीचे ठिकठिकाणी जागरण केले जाते. काही ठिकाणी दांडिया खेळला जातो. या उत्सवाचे तरुणाईला खूप आकर्षण असते. पण आजकालची तरुण पिढी आपल्या धुंदीत कोणतेही चुकीचे पाऊल उचलताना कोणताही विचार करत नाही. सार्वजनिक उत्सवांच्या ठिकाणी अनेक घटना समोर येतात. या उत्सवांमध्ये होणाऱ्या मारामाऱ्या, प्रेमप्रकरण, अत्याचार अशा अनेक गोष्टी घडत असतात. या घटनांना कुठेतरी आळा बसला पाहिजे. दांडिया नावाच्या बुरख्याखाली रात्र-रात्र भरकटणारी ही तरुण पिढी किती वाहवत जाल? सांगा ना? कुटुंबीयांचे संस्कार नैतिक मूल्य धाक दडपण काही सोडले नाही का? चांगल्या चांगल्या घरातल्या मुलामुलींनासुद्धा वाईट संगतीमध्ये राहून आजूबाजूचा विसर पडतो? आपणही माणसं आहोत हे विसरू नका! थोडीतरी माणुसकी जपा! -किती वाहत जाल?