Friday, September 19, 2025

India vs Oman: टीम इंडियाने ओमानला हरवले, मात्र विकेटसाठी भारताच्या गोलंदाजांना थकवले

India vs Oman: टीम इंडियाने ओमानला हरवले, मात्र विकेटसाठी भारताच्या गोलंदाजांना थकवले

अबुधाबी: आशिया कप २०२५चा ग्रुप स्टेजमध्ये शेवटचा सामना आज भारत आणि ओमान यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने २१ धावांनी बाजी मारली. या सामन्यात भारताने ओमानला जिंकण्यासाठी १८९ धावांचे आव्हान दिले होते. मात्र ओमानला या सामन्यात २० षटकांत ४ बाद १६७ धावाच करता आल्या.

भारताने या सामन्यात ओमानला हरवले खरे मात्र भारतीय गोलंदाजांना विकेटसाठी मात्र तरसवले. संपूर्ण सामन्यात भारताला केवळ ओमानच्या ४ विकेटच मिळवता आल्या. ओमानची सुरूवात जबरदस्त झाली. त्यांच्या दोन्ही फलंदाजांनी सावध सुरूवात करून दिली होती.

भारताने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १८८ धावा केल्या होत्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारताची सुरुवात चांगली झाली नाही. शुबमन गिल अवघ्या ५ धावा काढून बाद झाला. मात्र, अभिषेक शर्माने १५ चेंडूत ३८ धावांची वेगवान खेळी करत संघाला पॉवरप्लेमध्ये दमदार सुरुवात दिली. त्यानंतर संजू सॅमसनने एक बाजू सांभाळत डाव सावरला. त्याने ४५ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह ५६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

भारताला मधल्या फळीत काही धक्के बसले. हार्दिक पांड्या (१), शिवम दुबे (५) स्वस्तात बाद झाले. मात्र, अक्षर पटेलने (१३ चेंडूत २६) आणि तिलक वर्मा (१८ चेंडूत २९) यांनी आक्रमक फलंदाजी करत धावसंख्येला गती दिली. शेवटच्या षटकांमध्ये हर्षित राणाने केलेल्या १३ धावांच्या फटकेबाजीमुळे भारताला १९० च्या जवळ पोहोचता आले.

टीम इंडियाने आधीच सुपर ४मध्ये स्थान बनवले आहे आणि पाकिस्तानविरुद्ध २१ सप्टेंबरला होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्याआधी हा सामना टीम मॅनेजमेंटसाठी योग्य ठरू शकतो. तर ओमानचा संघ आधीच बाहेर झाला आहे आणि या स्पर्धेतील त्यांचा शेवटचा सामना आहे.

Comments
Add Comment