नागपूर : मुंबई महापालिका निवडणूक वगळता महाराष्ट्रात अन्य महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचा स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय आहे, असे पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केले. नागपूरमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'चिंतन शिबिरा'दरम्यान त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
पटेल पुढे म्हणाले की, पक्ष वाढवायचा म्हटल्यावर निवडणुकांत अनेकांना संधी द्यावी लागते. अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येच खऱ्या अर्थाने पक्ष वाढ होत असते. त्यामुळे मुंबई वगळता आमच्या पक्षाने उर्वरित महाराष्ट्रात स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे.
मुंबईबाहेर उर्वरित महाराष्ट्रात स्थानिक नेत्यांना युती करायची असेल, तर ते नक्कीच करू शकतात. पण आम्ही पक्ष स्तरावरून महायुती म्हणूनच लढा, असे आदेश देणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या सरकारमध्ये आहे. तिन्ही पक्षांच्या उत्तम समन्वयाने सरकार व्यवस्थित काम करत आहे. राष्ट्रवादीचे आठ मंत्री सरकारमध्ये आहेत. पण संबंधित मंत्र्यांचे हवे तेवढे लक्ष पक्ष संघटनेकडे नाही, अशी खंतही पटेल यांनी बोलून दाखवली.