
मुंबई (खास प्रतिनिधी) : यंदा पावसाने वेळेआधीच हजेरी लावल्यानंतर ज्या प्रकारे बरसात करत आहे, ते पाहता आता मुंबईतील जनता सुखावली आहे. वाढत्या उष्म्यामुळे पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या मुंबईकरांना हा पाऊस सुखावणारा ठरत असला तरी अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे तुंबणाऱ्या पाण्यांमुळे तो डोकेदुखीचाही ठरला आहे. त्यामुळे आता येरे पावसा ऐवजी जारे जारे पावसा महणण्याची वेळ मुंबईकरांवर आली असली तरी प्रत्यक्षात मुंबईतील पावसाचे टार्गेट मात्र पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत मुंबईत सरासरी १०३ टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
मुंबई वार्षिक सरासरी २२०० मिमी एवढा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला जातो. कुलाबा वेधशाळेच्या अंदाजानुसार शहरांत २०९५ मिमी एवढा वार्षिक पावसाचा अंदाज होता, तर सांताक्रुझ वेधशाळेच्या अंदाजानुसार वार्षिक २३१९ मिमी एवढा पावसाचा अंदाज होता. वेधशाळेच्या अंदाजानुसार १५ सप्टेंबरपर्यंत शहरांमध्ये १८८०.०७मिमी आणि उपनगरांमध्ये २८१७.०५ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे वेधशाळेने अंदाजित केलेल्या वार्षिक पावसाच्या अंदाजानुसार शहरांत आतापर्यंत ८९.७७ टक्के एवढा पाऊस नोंदला गेला आहे, तर उपनगरांमध्ये १२१.५० टक्के एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीमध्ये शहरामध्ये ९५.३३ टक्के आणि उपनगरांत १००.३१ टक्के पाऊस नोंदला गेला होता.
तसेच महापालिकेच्यावतीने मुंबईत अनेक ठिकाणी स्वयंचलित पर्जन्य बलमापन यंत्र बसवली आहे. या पर्जन्य मापनावरी नोंदीनुसार आतापर्यंत शहरांमध्ये १९५० मिमी एवढा पाऊस नोंदवला गेला असून याची टक्केवारी ९३.१२ आहे. तर पूर्व उपनगरांत २४४०.०४ मिमी आणि पश्चिम उपनगरांत २४१७.४४ मिमी एवढा पाऊस नोंदवला गेला आहे. त्यामुळे उपनगरांमध्ये १०४.७३ टक्के एवढा पाऊस पडला आहे. त्यामुळे महापालिकेच्या पर्जन्य जलमापनांवरील नोंदीनुसार संपूर्ण मुंबईत १०२.८३ टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
मात्र, यंदा शहरापेक्षा उपनगरांतच सवाधिक पावसाची नोंद झाली आहे. यंदाही १५ दिवस आधीच उपनगराने पावसाचा टप्पा पार केला आहे; परंतु संपूर्ण मुंबईचा विचार केल्यास आतापर्यंत १०२.८३ टक्के पावसाची नोंद झाल्याचे दिसून येते.