Tuesday, September 16, 2025

ठाणे, नवी मुंबई, पालघरमध्ये मुसळधार! हवामान खात्याने दिला रेड अलर्ट

ठाणे, नवी मुंबई, पालघरमध्ये मुसळधार! हवामान खात्याने दिला रेड अलर्ट

सखल भागात राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन

मुंबई: ठाण्यात सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने पुढील दोन दिवस मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे आणि सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रविवारी रात्री उशिरा सुरू झालेल्या नवी मुंबईच्या अनेक भागात पाणी साचले आहे. ज्याचा परिणाम रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर झाला आहे. तसेच मुसळधार पावसामुळे लोकल गाड्यांचा वेगही मंदावला. अनेक ठिकाणी झाडे आणि भिंती पडण्याच्या घटना देखील घडल्या आहेत.

हवामान खात्याकडून बेलापूरमध्ये २४ तासांत १५९ मिमी आणि नेरुळमध्ये १३८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. 

वाशी, कोपरखैरणे आणि ऐरोलीमध्ये पाणी साचल्यामुळे लोकांना घराबाहेर पडण्यासही अडचण आली. रेल्वे स्टेशन आणि मुख्य रस्त्यांवर पाणी साचल्याने ऑफिस, शाळा-कॉलेजला जाणाऱ्या नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागला. पनवेलच्या कुंभारवाडा भागात परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. सततच्या पावसामुळे घरात पाणी शिरले, ज्यामुळे लोकांच्या सामानाचे नुकसान झाले. दरम्यान स्थानिक नागरिकांनी मिळून मदतकार्य सुरू केले.  भाजपच्या माजी नगरसेविका रेणुका मोहकर आणि शिवसेना नेत्या किरण कलवेकर यांच्यासह इतरांनी बाधित नागरिकांना चहा, नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था केली. 

सोमवारी हवामान कसे असेल?

सोमवारी दिवसभर हलका पाऊस पडत असला तरी, धोका अद्याप संपलेला नाही. नवी मुंबईत आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे. सध्या, बेलापूर आणि नेरुळ भागात मुसळधार पावसामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने इशारा दिला आहे की, पुढील ४८ तासांत जोरदार वारे आणि विजांसह ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील. त्यामुळे सखल भागात राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment