
नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने पाकड्यांवर ७ विकेट्सने विजय मिळवला. पहलगाम हल्ल्याची जखम ताजी असताना भारतीय संघाने पाकिस्तानसोबत खेळण्यावर अनेक भारतीयांनी विरोध दर्शवला होता. इतकेच नव्हे तर अनेकांनी या सामन्याचा निषेध देखील केला. मुळात सरकारच्या काही आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील धोरणांमुळे बीसीसीआयला भारत आणि पाकिस्तानला एकत्र खेळवावे लागले. असे असले तरी, टीम इंडियाच्या खेळाडूंनी सर्व भारतीयांच्या भावनेचा आदर केला. टीम इंडियाच्या खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणं देखील टाळलं. ज्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र यामुळे, आता एक नवीन प्रश्न उपस्थित केला जातो आहे की, हस्तांदोलन न केल्यामुळे टीम इंडियावर आयसीसीकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार की नाही?
दरम्यान, पाकिस्तानच्या टीम मॅनेजरने टीम इंडियाच्या एकाही खेळाडूने हस्तांदोलन न केल्याबद्दल भारताविरुद्ध 'औपचारिक निषेध' नोंदवल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता आयसीसीआय कोणते पाऊल उचलणार? आणि हस्तांदोलन करणे अनिवार्य असतेच का? असे प्रश्न साहजिकच दोन्ही देशांच्या क्रीडा चाहत्यांना पडला आहे.
खेळाचा नियम काय सांगतो?
क्रिकेटच्या नियमांनुसार, जर एखादा संघ सामन्यापूर्वी किंवा नंतर विरोधी संघातील खेळाडूंशी हस्तांदोलन करत नसेल तर तो गुन्हा ठरत नाही. हस्तांदोलन हा खेळ भावनेचा एक भाग मानला जातो. कोणत्याही संघाला किंवा त्यांच्या खेळाडूंना सामन्यादरम्यान त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांशी हस्तांदोलन करण्यास भाग पाडले जात नाही. दोन्ही संघांचे खेळाडू सामन्यानंतर हस्तांदोलन करतात ही फक्त क्रिकेट संस्कृतीची बाब आहे. स्पर्धा ही ICC ची असो, ACC ची असो किंवा देशांतर्गत इतर कोणतीही असो, विरोधी संघाशी हस्तांदोलन करणं अनिवार्य नसते.
त्यामुळे पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कोणताही दंड आकारला जाणार नाही, कारण असं करणं क्रिकेटच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन नाही.