
मुंबई: संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही अशा शब्दात अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी संजय राऊत यांवर तिखट टिका केली आहे. राऊत यांनी अजितदादा पवार यांच्यावर केलेल्या टिकेनंतर अनंत परांजपे यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
टी २० आशिया कप २०२५ स्पर्धेत आज पांरपरिक प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना होणार आहे. या सामन्यावरुन भारत-पाकिस्तान मॅचला विरोधकांकडून विरोध होत असताना दुसरीकडे आज उबाठा गटाकडून राज्यभर ‘माझं कुंकू माझा देश’ आंदोलन करण्यात आलं आहे. तर सत्ताधारी व विरोधक यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर संजय राऊत यांनी टिका केली होती, त्याला जोरदार प्रत्युत्तर देताना आनंद परांजपे यांनी राऊतांना बिनडोक राजकारणी असे संबोधले. ते म्हणाले, "संजय राऊतसारख्या बिनडोक माणसाकडून अजितदादा पवार यांना देशप्रेमाची, देशभक्तीच्या कुठल्याही सर्टीफिकेटची गरज नाही".
शिवसेना उबाठाच्या रॅलीतील विजयोत्सवामध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचवले याचे उत्तर संजय राऊत यांनी संपूर्ण महाराष्ट्राला पहिल्यांदा द्यावे असे खडेबोल देखील त्यांनी सुनावले. तसेच आज दुबईत होणाऱ्या भारत - पाकिस्तान सामन्याचा विरोधच करायचा असेल तर पहिल्यांदा मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये (MCA) सदस्य असलेले उबाठा आमदार मिलिंद नार्वेकर यांचा राजीनामा पहिल्यांदा घ्यावा असे थेट आव्हानच आनंद परांजपे यांनी दिले.