
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू हळू सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनता दलचे नेते तेजस्वी यादव आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सत्ताधारी रालोआ (एनडीए) विरोधात मोठी यात्रा काढला. राहुल गांधींना उन्हातान्हात फिरवण्यात आले. पण यात्रा झाल्यानंतर काही दिवसांतच राष्ट्रीय जनता दलच्या तेजस्वी यादव यांनी त्यांचे मूळ रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे.
बिहारच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल सर्वच्या सर्व २४३ जागा लढवणार, असे तेजस्वी यादव यांनी जाहीर केले आहे. यामुळे बिहारमध्ये राजदसोबत यात्रा काढणाऱ्या काँग्रेसची राजकीय कोंडी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. स्वतःला राष्ट्रीय पक्ष म्हणवून घेणाऱ्या काँग्रेसला राजदने उल्लू बनवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
मुझफ्फरपूर येथे झालेल्या जाहीर सभेत राजद नेते तेजस्वी यादव यांनी २४३ जागा लढवण्याची घोषणा केली. माझे नाव डोळ्यांपुढे आणा आणि मतदान करा. बिहारला पुढे नेण्यासाठी काम करणार, असेही तेजस्वी यादव म्हणाले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबत मतदार हक्क यात्रा काढल्यानंतर तेजस्वी यादव यांनी बिहारच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल सर्वच्या सर्व २४३ जागा लढवणार असल्याचे जाहीर केले.
बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल हा सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे. नुकत्याच काढलेल्या यात्रेमुळे पक्षाविषयीची विश्वासार्हता वाढली आहे. यामुळेच सर्व जागा लढवण्याचे नियोजन सुरू असल्याचे तेजस्वी यादव यांनी जाहीर केले.