वाचन गुरू

“काय रे अजय, सध्या पुस्तक वाचन अगदी जोरात सुरू आहे तुझं. हा एवढा बदल अचानक कसा काय घडलाय!” तसा अजय म्हणाला, “काही नाही गं आई, मला एक गुरू भेटला. सात-आठ वर्षांचा. त्यानेच सांगितलं, माणसाच्या आयुष्यात वाचन किती महत्त्वाचं आहे ते!”


सकाळी सकाळीच अजयचं आईशी भांडण झालं. “लवकर ऊठ, अभ्यास कर, शाळेत जायचंय” आईची अजयजवळ सारखी भुणभुण चालली होती. अजयला शाळेचा खूपच कंटाळा, त्यात आईची सारखी भुणभुण. मग अजयचा पारा एकदम चढला. “जा, आता मी शाळेतच जाणार नाही,” असं म्हणून तो घरातून बाहेर पडला. पण आईने त्याला हाताला धरून परत घरात आणलं. त्या भांडणात दोन तास कसे गेले हेच कळले नाही. मग शाळेची वेळ झाली. आईची कटकट ऐकायला नको, म्हणून मोठ्या घुश्यातच पाठीवर दप्तर अडकवून अजय घराच्या बाहेर पडला.


सकाळचे ११ वाजले होते. तो शाळेच्या दिशेने निघाला खरा, पण आज त्याला शाळेत जायचंच नव्हतं. पाय शाळेच्या दिशेने चालत होते आणि मनात मात्र वेगळेच विचार होते. चालता चालता त्याला एक छोटेसं दुकान दिसलं. दुकान कसलं टपरीचं म्हणा हवं तर! गोळ्या, बिस्किटांच्या काचेच्या बरण्या ओळीने मांडून ठेवल्या होत्या. एखादं चॉकलेट घेऊ या विचाराने अजय जवळ गेला. पण दुकानात तर त्याला कोणीच दिसेना. म्हणून त्याने टाचा उंचावून पाहिले तर एक छोटा मुलगा आत बसला होता. तो कुठलं तरी पुस्तक वाचत होता. अजयला आश्चर्य वाटलं. हा सात-आठ वर्षांचा मुलगा दुकानावर बसलाय गोळ्या-बिस्किटे विकायला आणि हातात पुस्तक घेऊन वाचन करतोय.


अजय पुढे झाला अन् म्हणाला, “अरे मुला चॉकलेट केवढ्याला आहे हे!” “पाच रुपये दादा, देऊ का?” मुलगा उत्साहाने म्हणाला. अजयने लगेच खिशातून पाच रुपये काढले आणि चॉकलेट घेतले. तो समोर बसलेला मुलगा चुणचुणीत होता.


अंगावर साधेच कपडे त्याने घातले होते. तो अगदी मन लावून पुस्तक वाचत होता. अजय मोठ्या कुतूहलाने म्हणाला, “काय रे, नाव काय तुझं?” “अभिमन्यू”. मुलाने नाव सांगताच अजय चमकला! “काय अभिमन्यू!” असं काही भारदस्त नाव याचं असेल असं अजयला अजिबात वाटलं नव्हतं. अजयने स्वतःला सावरलं आणि म्हणाला, “काय वाचतोस?” “महात्मा गांधींचं पुस्तक आहे. दादा मला गांधीजी खूप आवडतात. मी त्यांची भरपूर पुस्तकं वाचलीत. बोलताना मुलाचा चेहरा आत्मविश्वासाने उजळून निघाला होता.” अजय पुन्हा म्हणाला, “कोणत्या शाळेत जातोस?” “नाही दादा, मी नाही जात शाळेत. शाळेत गेलो तर मग हे दुकान कोण सांभाळणार?” आता मात्र अजयवर वेड लागायची पाळी आली. हा मुलगा शाळेतही जात नाही आणि तरीही गांधीजी वाचतो आणि मी ‘मोहनदास करमचंद गांधी’ या नावाव्यतिरिक्त त्यांचं अजून काहीच वाचलं नाही!
अजयचं मन तुलना करू लागलं. तो मुलगा आणि मी! मी चांगल्या कुटुंबातला. छान अशा घरात राहणारा. मोठ्या शाळेत जाणारा. शाळेत जायचं आणि अभ्यास करायचा याशिवाय कोणतंच काम मला नसतं. तरीही मला शाळेत जायचा कंटाळा. अभ्यासाचा कंटाळा. अभ्यासाची पुस्तकं सोडून एकही गोष्टीचं पुस्तक मी कधी वाचलं नाही. अभ्यासावरून रोज आईशी भांडण. अजयला त्या मुलाचा हेवा वाटला आणि स्वतःची लाज वाटू लागली. आता तो भानावर आला. अजून एक चॉकलेट त्यानं विकत घेतलं आणि ते परत त्या मुलाला देत म्हणाला, “अरे अभिमन्यू हे घे चॉकलेट. माझ्याकडून तुला भेट!” “नको दादा, कशाला पाच रुपये फुकट घालवता.” तो मुलगा म्हणाला. तसा अजय म्हणाला, “फुकट नाही घालवत. तुझ्यासारख्या गुणी मुलाचं मी कौतुक करतोय. मग कौतुक झाल्यावर खाऊ नको का द्यायला!’’ मुलाने पुस्तक बंद केले. तेव्हा अजयला समजलं की ते पुस्तक होते महात्मा गांधींचे “माझी आत्मकथा!”


मग अजय मुलाचा निरोप घेऊन थेट शाळेच्या दिशेने चालू लागला. मनात विचारांची गर्दी झाली होती. आपण काय करतोय याचं त्याला भान आलं होतं. आता अजयच्या मनातला शाळेचा कंटाळा कुठल्या कुठे पळून गेला. वर्गात अगदी शहाण्या मुलासारखा बसला. संध्याकाळी घरी येताना शाळेच्या ग्रंथालयातले “राजा शिवछत्रपती” हे पुस्तक घेऊन आला आणि तहान भूक विसरून झपाटल्यासारखा वाचू लागला. दोन-तीन दिवस उलटून गेले. आई-बाबांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. आपला अजय पुस्तक वाचनात एवढा कसा काय गुंतलाय. याचं आई-बाबांना आश्चर्यच वाटत होतं. मग एक दिवस आईनेच विचारलं, “काय रे अजय, सध्या पुस्तक वाचन अगदी जोरात सुरू आहे तुझं. हा एवढा बदल अचानक कसा काय घडलाय!” तसा अजय म्हणाला, “काही नाही गं आई, मला एक गुरू भेटला. सात-आठ वर्षांचा. त्यानेच सांगितलं, माणसाच्या आयुष्यात वाचन किती महत्त्वाचं आहे ते!”

Comments
Add Comment

अरोरा म्हणजे काय असते?

अरोरा म्हणजे तो ध्रुवांवर पडणारा तेजस्वी प्रकाश. त्याचे आकारही वेगवेगळे असतात. कधी प्रकाश शलाका असतात, तर कधी

आरामदायक क्षेत्र

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ एक गमतीशीर गोष्ट सांगते. उकळत्या पाण्यामध्ये बेडकाला टाकल्यावर तो क्षणात बाहेर

वृत्तपत्रांचे महत्व

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर मानवी जीवनात माहिती, ज्ञान आणि घडामोडींचा मागोवा घेण्यासाठी वृत्तपत्र

वृद्धाश्रम...

कथा : रमेश तांबे सुमती पाटील वय वर्षे सत्तर. वृद्धाश्रमातल्या नोंदवहीत नाव लिहिलं गेलं आणि भरल्या घरात राहणाऱ्या

सूर्य गार भागात का जात नाही ?

कथा : प्रा. देवबा पाटील दुपारच्या सुट्टीत सुभाष आल्यानंतर आदित्य मित्रमंडळाच्या व सुभाषच्या डबा खाता खाता

खेड्याकडे चला

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ आईच्या पेन्शन बँकेत तिचे ‘केवायसी’ करायचे म्हणून मी इंडियन बँकेत गेले होते.