
पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन ती सोडवा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. खराडी ते केशवनगर पुलाच्या कामांसह मुंढवा चौक आणि हडपसर गाडीतळ येथे वाहतूक कोंडी सोडवण्याकरिता स्थळ पाहणी करत अजित पवारांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
खराडी ते केशवनगर पुलाचे काम करतांना अत्याधुनिक, दर्जेदार साहित्य वापरावे. या पुलामुळे चंदननगर, केशव नगर, खराडी परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडीपासून सुटका मिळणार असल्याने कामे गतीने पूर्ण करा; असे निर्देश अजित पवारांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. याप्रसंगी नागरिकांनी अजित पवारांची भेट घेतली. पाणी, रस्ते, पथदिवे, कायदा व सुव्यवस्था, बससेवा आदींबाबत विविध मागण्या केल्या. या मागण्या ऐकून घेतल्यानंतर अजित पवारांनी त्या प्राधान्याने मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही नागरिकांना दिली. याप्रसंगी एका पुणेकर महिलेने अजित पवारांना एक विशेष विनंती केली. अचानक येऊन पाहणी करा म्हणजे इथल्या समस्या व्यवस्थित समजतील, असे महिला अजित पवारांना म्हणाली. नागरिकांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी योग्य ते प्रयत्न करू असे आश्वासन अजित पवारांनी दिले.
मुंढवा चौक आणि हडपसर गाडीतळ येथील वाहतूक कोंडी सोडविण्याकरिता आवश्यक ते सर्व पर्याय विचारात घेऊन पुणे महानगर पालिका, पोलीस प्रशासन, पीएमपीएल, लोकप्रतिनिधींनी मिळून बैठक आयोजित करुन योग्य ती कार्यवाही करावी, अशी सूचना अजित पवारांनी केली.