
स्नेहधारा : पूनम राणे
रामपूर नावाचे गाव होते. तुरळ लोकवस्ती असलेले. त्या गावात राम नावाचा मुलगा राहत होता. अंगाने सडसडीत, उंच गोरापान. त्याच्या वडिलांचे लहानपणीच निधन झाले होते. त्याच्या कुटुंबाला खायला दोन वेळचं जेवण मिळत नसे. म्हणून तो आईसोबत मजुरी करत होता. तो अत्यंत प्रामाणिक व हुशार होता.
एके दिवशी त्याची आई खूप आजारी होती. डॉक्टरने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागेल असेही सांगितले होते. म्हणून तो आज एकटाच काम संपवून घरी लगबगीने चालला होता. लवकर पोहोचता यावे म्हणून तो एखादे वाहन मिळते का, म्हणून इकडे तिकडे पाहत होता. त्याला एकही वाहन दिसत नव्हते. खूप वेळ तो रस्त्यावर थांबला होता. तेवढ्यात त्याला एक रिक्षा येताना दिसली. त्याने लगबगीने हातवारे करून रिक्षा थांबवली. रिक्षावाल्याने रिक्षा थांबवली आणि बाजारातील रिक्षा स्टॅन्डजवळ तो उतरला. रामला आपल्या आईला बघेपर्यंत त्याच्या जीवात जीव नव्हता. केव्हा एकदा आपल्या आईला पाहतो असे त्याला झाले होते. झटपट आपल्या पॅन्टच्या खिशातून पैसे काढून त्याने रिक्षा ड्रायव्हरला दिले. रिक्षा, रिक्षा म्हणून दुसऱ्या प्रवासाने रिक्षा थांबवली. तो दुसरा प्रवासी रिक्षात बसणार एवढ्यात त्याला सीटवर पैशाचे पाकीट पडलेले दिसले. प्रवाशाने रिक्षावाल्याच्या ते लक्षात आणून दिले. बापरे! हा कुठे राहत असेल? या विचारात त्याने ते पाकीट उघडले. त्या पाकिटात बरीच रक्कम आणि एक कार्ड होते. त्याला त्या कार्डवर मोबाइल नंबर लिहिलेला दिसला. ते कार्ड राम जिथे काम करत होता त्या मालकाचे होते. रिक्षावाल्याने मालकाकडून मोबाइल नंबरवरून रामचा पत्ता घेतला व त्याच्या घरी पोहोचला. रामने त्याला ओळखले. मग त्याच्या लक्षात आले की, मी ज्यांच्या रिक्षात बसलो ते हे रिक्षावाले काका आहेत. मग रामने विचारले,“आपण इथे कसे आलात!”
अरे, तुझे पाकीट तू रिक्षात विसरून आला होतास. हे पाकीट मी तुला द्यायला आलो आहे. राम हात जोडून म्हणाला, तुम्ही मला हे पाकीट आणून दिले. नाही तर तुमच्या जागी दुसरं कोणी असतं तर त्यांनी थांगपत्ताही लागू दिला नसता... मग रामने त्याला आनंदी होऊन ५०० रुपये देऊ केले, व म्हणाला खरं म्हणजे पुढील पगार माझ्या साहेबांकडून मागून घेतला होता.
आज केवळ माझ्या आईच्या ऑपरेशन करता पैसे मागण्यासाठी साहेबांकडे गेलो होतो. मी तुमचे आभार कोणत्या शब्दात मानू हेच कळत नाही.तुमच्यासारखी प्रामाणिक माणसे या जगात खूप कमी आहेत. मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. असे म्हणून आपले दोन्ही हात जोडून रिक्षावाल्या काकांना नमस्कार केला.
यावर रिक्षाचालक काका म्हणाले, हे बघ मला हे पाचशे रुपये नकोत. अरे, तुझ्या आईचे ऑपरेशन करायचं आहे, ते करून घे. रिक्षाचा व्यवसाय करता करता केवळ वेळेअभावी मनात असूनही समाज उपयोगी काम करता येत नाही. पण काही प्रमाणात का होईना, माझ्या हातून आज हे छोटेसे काम करून माणूसपण जपता आलं. हेच बक्षीस माझ्यासाठी पुरेसे आहे.
तात्पर्य : जीवनात प्रामाणिकपणा फार महत्त्वाचा असतो.