Sunday, September 14, 2025

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक येथे आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही देवव्रत यांचे स्वागत केले. कौशल्य विकास मंत्री आणि मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार, राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त मुख्य सचिव आणि मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, रेल्वे पोलीस महासंचालक प्रशांत बुरुडे, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, मुंबई शहर जिल्हाधिकारी आँचल गोयल तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक येथे रेल्वे पोलीस विभागाच्यावतीने महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांना मानवंदना देण्यात आली. नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत हे सोमवार १५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता शपथ घेतील आणि पदभार स्वीकारतील. राजभवन येथे दरबार हॉलमध्ये शपथविधी होणार आहे.

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी एनडीएचे उमेदवार म्हणून उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यासाठी राजीनामा दिल्यापासून महाराष्ट्राचे राज्यपालपद रिक्त आहे. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे पुढील निर्णय होईपर्यंत महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

कोण आहेत आचार्य देवव्रत ?

आचार्य देवव्रत हे एक अनुभवी शिक्षणतज्ज्ञ आणि राजकारणी आहेत, जे सध्या गुजरातचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या राजकीय आणि प्रशासकीय कारकिर्दीची सुरुवात हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदापासून झाली होती. आचार्य देवव्रत हिमाचल प्रदेशचे जवळपास चार वर्ष राज्यपाल राहिले, २०१५ पासून २०१९ पर्यंत त्यांनी त्या पदावर कामगिरी केली. त्यांच्या कार्यकाळात राज्यातील प्रशासनिक सुधारणांपासून शिक्षण क्षेत्रातील उपक्रमांपर्यंत विविध पद्धतींचा अभूतपूर्व अनुभव मिळाला. हिमाचल प्रदेशमधील कार्यकाळानंतर, त्यांना राज्यपाल म्हणून गुजरातची जबाबदारी देण्यात आली. आता त्यांच्या अनुभवाचा पुढचा टप्पा महाराष्ट्रासाठी आहे, कारण महाराष्ट्राचे राज्यपालपद त्यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारीसह सोपवण्यात आले आहे. आचार्य देवव्रत यांच्या कार्यकाळात प्रशासनातील पारदर्शकता, शिक्षण क्षेत्रातील सुधारणा आणि राजकीय संतुलन राखण्याची क्षमता लक्षवेधी ठरली आहे, त्यामुळे महाराष्ट्रातही त्यांच्या नेतृत्वाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गुजरातचे राज्यपाल म्हणून काम करण्यापूर्वी, देवव्रत यांनी ऑगस्ट २०१५ ते जुलै २०१९ पर्यंत हिमाचल प्रदेशचे राज्यपालपद भूषवले होते. त्यांनी जुलै २०१९ पासून गुजरातचे राज्यपाल म्हणून काम सुरू केले. लवकरच ते गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांचे राज्यपाल म्हणून कार्यभार हाताळणार आहेत. आचार्य देवव्रत यांनी इतिहास आणि हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. योग विज्ञानात डिप्लोमा केला आहे. निसर्गोपचार आणि योगिक विज्ञानात ते डॉक्टर आहेत. वैदिक मानवी मूल्ये आणि वैदिक तत्वज्ञानावर त्यांनी व्याख्याने दिली आहेत. नैसर्गिक शेती आणि गोवंश सुधारणेबद्दल जागरूकता पसरविण्यासाठी त्यांनी भरपूर काम केले आहे.

Comments
Add Comment