Saturday, September 13, 2025

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स' (पेटा) इंडियाला अंतरिम ताब्यात देण्याचा आदेश देण्यात आला आहे. न्यायाधीशांनी प्राण्यांना त्यांच्या पूर्वीच्या मालकांना परत करू नये यावर सहमती दर्शवली, कारण ते सध्या कायदेशीर आरोपांचा सामना करत आहेत.

३१ जुलै रोजी एका महिलेने दोन पुरुषांनी चालवलेल्या झूंजीचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर 'पेटा इंडिया'ला या बेकायदेशीर मेंढ्यांच्या झूंजीची माहिती मिळाली. संस्थेने लगेच निर्मल नगर पोलिसांकडे तक्रार दाखल केली, ज्यामुळे 'भारतीय न्याय संहिता' आणि 'प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा' अंतर्गत दोन अज्ञात व्यक्तींविरोधात 'एफआयआर' दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दोन्ही मेंढ्यांचा शोध घेतला आणि त्यांना 'बाई सकलकरबाई दिनशा पेटिट हॉस्पिटल फॉर अॅनिमल्स'मध्ये वैद्यकीय उपचारांसाठी पाठवले. त्यानंतर, 'पेटा इंडिया'ने प्राण्यांच्या अंतरिम ताब्यासाठी न्यायालयात अर्ज सादर केला.

२६ ऑगस्ट रोजी बांद्रामधील ३२ व्या न्यायिक दंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालयाने 'पेटा इंडिया'ची विनंती मंजूर केली. वकील जय गुप्ता यांनी न्यायालयात सविस्तर युक्तिवाद सादर केला, ज्यात मेंढ्यांना त्यांच्या मालकांकडे परत करण्याऐवजी एका प्रतिष्ठित प्राणी आश्रमात पुनर्वसनासाठी पाठवले जावे, कारण मालक पुन्हा त्यांच्यावर अत्याचार करण्याची शक्यता आहे, यावर त्यांनी जोर दिला.

संस्थेने आरोपी मालकांकडून प्राण्यांच्या देखभालीसाठी दरमहा ३,६०० रुपये भरपाईचीही मागणी केली होती, परंतु आरोपी सुनावणीसाठी हजर नसल्यामुळे ती मंजूर झाली नाही. 'पेटा इंडिया'ची क्रूरता प्रतिसाद समन्वयक सलोनी सकारिया यांनी पोलीस आणि न्यायालयाचे त्यांच्या जलद कारवाईबद्दल आभार मानले आणि सांगितले की, प्राण्यांवरील क्रूरता सहन केली जाणार नाही.

मेंढ्यांची झूंज ही एक हिंसक प्रथा आहे, ज्यात दोन नर मेंढ्यांना एकमेकांवर आदळण्यास भाग पाडले जाते, जोपर्यंत एक जिंकत नाही. 'पेटा इंडिया'ने सांगितले की, या प्रथेमुळे प्राण्यांना गंभीर शारीरिक आणि मानसिक इजा होते, ज्यात हाड मोडणे आणि गंभीर तणावाचा समावेश आहे. 'प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, १९६०' प्राण्यांना लढण्यासाठी प्रवृत्त करण्यास सक्तीने प्रतिबंध करतो. 'पेटा इंडिया' आणि 'अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया' यांच्या याचिकेनंतर २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाने बैलांची, रेड्यांची झोंबी आणि कुत्र्यांच्या झूंजीसह सर्व प्रकारच्या आयोजित केलेल्या प्राण्यांच्या झूंजी बेकायदेशीर ठरवल्या.

Comments
Add Comment