
उद्याचा रविवार क्रीडाप्रेमींसाठी दुहेरी थरार, हॉकी आणि क्रिकेटचे दोन्ही सामने महत्वाचे!
नवी दिल्ली: उद्या दि. १४ सप्टेंबरचा रविवार हा क्रीडाप्रेमींसाठी एका उत्सवापेक्षा कमी नसेल. कारण या दिवशी दोन महत्वाचे सामने रंगणार आहेत, ज्यात विजय मिळवणे भारतीयांसाठी प्रतिष्ठेचा आणि वर्चस्वाचा विषय ठरणार आहे. कारण, क्रिकेटमध्ये टीम इंडियाची लढत पाकिस्तानशी तर हॉकीमध्ये महिला हॉकी संघाची लढत चीनशी असणार आहे.
क्रिकेट आणि हॉकी हे दोन वेगवेगळे खेळ असले तरी, आशियातील दोन ऐतिहासिक प्रतिस्पर्धी एकाच दिवशी, त्याच संध्याकाळी उत्साहाचे वादळ निर्माण करण्यास सज्ज आहेत. हा सुपर संडे खेळ फक्त गुणांपुरता मर्यादित राहणार नाही तर अभिमान, उत्साह आणि प्रतिष्ठेचे प्रतीक बनेल. ज्यावर संपूर्ण जगाचे लक्ष असेल.
पाकिस्तान आणि चीनशी होणार भारताचा मुकाबला
भारतातील दोन वेगवेगळे संघ त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि चीनशी भिडतील. एकीकडे, दुबईमध्ये आशिया कप क्रिकेट सामन्यात टीम इंडिया पाकिस्तानशी भिडणार आहे. तर दुसरीकडे, महिला हॉकी आशिया कपची जेतेपदाची लढाई हांग्जोच्या भूमीवर होणार आहे, जिथे भारतीय संघ यजमान चीनशी भिडणार आहे.
भारत पाकिस्तान सामना विवादात, पण उत्साहही कायम
दुबईच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना रंगणार आहे. हा सामना भारतीयांसाठी महत्त्वाचा आहे कारण पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांचे संघ पहिल्यांदाच एकमेकांशी भिडणार आहेत. या सामन्याबाबत विरोधही शिगेला पोहोचला आहे. पण नेहमीप्रमाणे उत्साहही कायम आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रविवारी रात्री ८ वाजता सुरू होईल. भारत आणि पाकिस्तानच्या इतिहासावर नजर टाकली तर आतापर्यंत दोन्ही देश टी-२० सामन्यांमध्ये १३ वेळा एकमेकांसमोर आले आहेत. यामध्ये भारताने पाकिस्तानला ९ वेळा हरवले आहे, तर पाकिस्तानने ३ वेळा विजय मिळवला आहे. तर एक सामना बरोबरीत सुटला होता, जो भारताने बॉल आउट या नियमाने जिंकला होता.
आशिया कपमध्येही भारताचा वरचष्मा आहे. दोन्ही संघ टी-२० स्वरूपात ३ वेळा एकमेकांशी भिडले आहेत आणि भारताने २ वेळा विजय मिळवला आहे. पण दुबईच्या ज्या खेळपट्टीवर हा सामना खेळला जात आहे त्या खेळपट्टीवर पाकिस्तान आघाडीवर आहे. या मैदानावर खेळल्या गेलेल्या ३ पैकी २ सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला आहे.
महिला हॉकी संघ चीनशी भिडणार
महिला हॉकी आशिया कपच्या अंतिम फेरीत चीन आणि भारत आमनेसामने येणार आहेट. भारतीय महिला हॉकी संघाने जपानविरुद्ध १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर भारतीय संघाचे लक्ष चीन आणि कोरिया यांच्यातील सामन्यावर होते. या सामन्यात यजमान चीनने सुपर ४ टप्प्यातील शेवटच्या सामन्यात कोरियाचा १-० असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. कोरियाच्या पराभवासह भारतीय संघाचे अंतिम तिकीटही निश्चित झाले. हा अंतिम सामना जो जिंकेल तो पुढील वर्षी बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी पात्र ठरेल.
यापूर्वी, भारतीय पुरुष हॉकी संघाने आशिया कपचा अंतिम सामना जिंकला आहे, आणि या विजयाबरोबरच त्यांनी विश्वचषकासाठी आपली पात्रता सिद्ध देखील केली आहे. त्यामुळे आता भारताच्या महिला हॉकी संघाच्या कामगिरीवर साऱ्यांच्या नजरा वेधल्या आहेत.