
काठमांडू : नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण मिळालंय. गेल्या काही दिवसांपासून राजधानी काठमांडूसह विविध भागांत निदर्शने होत असून, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. आंदोलकांनी सरकारविरोधी घोषणा देत मंत्र्यांच्या निवासस्थानांची जाळपोळ केली, तर संसदेच्या इमारतीवरही हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर तीन दिवस उलटूनही नेपाळमधील परिस्थिती अजूनही सुधारलेली नाही. आंदोलनाच्या आडून गुन्हेगारांनी संधी साधत हिंसाचाराचा मार्ग स्वीकारल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनासोबतच परदेशी नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गुरुवारी, काठमांडूजवळ आंदोलनकर्त्यांनी भारतीय प्रवाशांनी भरलेल्या एका बसवर हल्ला केला. हल्लेखोरांनी प्रवाशांचे सामान लुटले असून, बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, बस क्रमांक उत्तर प्रदेश (UP) नोंदणीचा होता आणि त्यामध्ये प्रवास करणारे बहुतेक लोक आंध्र प्रदेशचे रहिवासी होते. दरम्यान, नेपाळ सरकारवर देशातील कायदा व सुव्यवस्थेच्या बिघाडाबद्दल टीका होत असून, सोशल मीडिया बंदीचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे.
नेपाळ आंदोलनात भारतीय बसवर हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलनकर्त्यांनी गुरुवारी भारतीय प्रवाशांनी भरलेल्या बसवर अचानक हल्ला चढवला. सुरुवातीला हल्लेखोरांनी बसवर दगडफेक केली, ज्यामुळे बसची काच फुटली आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर आंदोलकांनी बसमध्ये घुसून प्रवाशांचे मोबाईल फोन, रोकड आणि इतर मौल्यवान वस्तू लुटल्या. या घटनेत किमान आठ प्रवासी जखमी झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच नेपाळी लष्कराचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि प्रवाशांना मदत केली. तात्काळ भारतीय दूतावासालाही या हल्ल्याची माहिती देण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर सर्व भारतीय प्रवाशांना सुरक्षितपणे काठमांडूहून विमानाने दिल्लीला आणण्यात आले. बस चालकाच्या माहितीनुसार, हल्ला झाल्यावेळी ही बस उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील सोनौली सीमेच्या अगदी जवळ पोहोचली होती. त्यामुळे सीमावर्ती भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, सुरक्षेत अधिक कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

नवी दिल्ली : भारताचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी. राधाकृष्णन यांनी शपथ घेतली. दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे शपथविधी सोहळा झाला. राष्ट्रपती द्रौपदी ...
नेपाळ आंदोलनानंतर सीमावर्ती राज्यांमध्ये अलर्ट
नेपाळमधील आंदोलन अधिक उग्र होत असल्याने भारतातही सतर्कतेचे वातावरण आहे. हल्ल्यातून बचावलेल्या बस चालक राज यांनी सांगितले की, आंदोलकांनी बसची एकही काच सुरक्षित ठेवली नाही. प्रवाशांचा जीव वाचला हेच मोठं भाग्य असल्याचं त्यांनी नमूद केलं. नेपाळमधील या हिंसक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने सीमावर्ती राज्यांना अलर्ट जारी केला आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या तिन्ही राज्यांमध्ये नेपाळ सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये विशेष खबरदारी घेतली जात आहे. पोलिस आणि प्रशासनाकडून सीमावर्ती भागात गस्त वाढवण्यात आली आहे. दरम्यान, भारतात अडकलेल्या नेपाळी नागरिकांची पडताळणी करून त्यांना परत पाठवले जात आहे. दुसरीकडे, नेपाळमध्ये अडकलेले भारतीय नागरिकही हळूहळू परत येत आहेत. यासाठी काठमांडूमधील भारतीय दूतावासाने आवश्यक व्यवस्था केल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. या सर्व घडामोडींमुळे भारत-नेपाळ सीमेवर तणावाचे वातावरण असून, परिस्थिती काबूत आणण्यासाठी दोन्ही देशांच्या प्रशासनामध्ये सतत संपर्क सुरू आहे.