Thursday, September 18, 2025

Police Bharti 2025: पोलिस भरतीत तरुणांसाठी सुवर्णसंधी! महाराष्ट्र सरकारची वयोमर्यादेत विशेष सूट

Police Bharti 2025: पोलिस भरतीत तरुणांसाठी सुवर्णसंधी! महाराष्ट्र सरकारची वयोमर्यादेत विशेष सूट

मुंबई: महाराष्ट्रातील असे अनेक तरुण आहेत, जे पोलिस अधिकारी किंवा कॉन्स्टेबल बनण्याचे स्वप्न उरी बाळगून आहेत, आणि त्यासाठी जीवतोड प्रयत्न देखील करत आहेत. मात्र याबरोबरच असेही काही तरुण आहेत, की ज्यांची वयोमर्यादा ओलांडल्यामुळे ते आता पुन्हा भरतीसाठी अर्ज करू शकत  नाहीत. तर अशा सर्वांसाठी महाराष्ट्र सरकारकडून वयोमर्यादेत विशेष सूट देण्यात आली आहे. यामुळे अनेक तरुणांचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे. 

महाराष्ट्र सरकारने पोलीस दल आणि तुरुंग विभागात १५,६३१ पदांसाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेतील वयोमर्यादेत विशेष सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याचा फायदा महाराष्ट्रातील हजारो तरुणांना होणार आहे. 

गृह विभागाने दि.१० सप्टेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, २०२२, २०२३, २०२४ आणि २०२५ मध्ये ज्या उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडली आहे ते देखील या भरतीत अर्ज करू शकतील. यापूर्वी २०२२ आणि २०२३ मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाच सवलत देण्यात आली होती, परंतु ताज्या शुद्धीपत्रकात ती आणखी दोन वर्षे वाढवून २०२५ करण्यात आली आहे.

दि.१ जानेवारी २०२४ ते दि.३१ डिसेंबर २०२५ दरम्यान पोलिस आणि तुरुंग विभागात रिक्त असलेल्या एकूण १५,६३१ पदांसाठी ही भरती करण्यात येत आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक (प्रशिक्षण आणि विशेष पथक) यांनी १ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या पत्राच्या आधारे या पदांवर भरती करण्याचा प्रस्ताव अंमलात आणण्यात आला आहे.

या निर्णयामुळे पोलिस विभागात काम करू इच्छिणाऱ्या राज्यभरातील अनेक तरुणांच्या आशा पुन्हा जागृत झाल्या आहेत.  कोरोना साथीमुळे आणि भरती प्रक्रियेतील विलंबामुळे वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांची संख्या जास्त असल्या कारणामुळे, सरकारचे हे सकारात्मक पाऊल असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.  त्यामुळे वयोमर्यादा ओलांडणारे तरुण देखील या भरती प्रक्रियेत सहभागी होऊन, आपले स्वप्न साकार करू शकतील.

वयोमर्यादेतील सवलत विशेष भरती प्रक्रियेपुरतीच मर्यादित

सरकारी सूत्रांनुसार, वयोमर्यादेतील ही सवलत केवळ या विशेष भरती प्रक्रियेपुरती मर्यादित असेल. उमेदवारांना अटी आणि शर्तींचे पालन करणे बंधनकारक असेल आणि सर्व निवड प्रक्रिया पूर्व-निर्धारित मानकांनुसार असेल. या निर्णयाबद्दल महाराष्ट्रातील तरुणांमध्ये प्रचंड उत्साह आहे. सोशल मीडियावरही हे स्वागतार्ह पाऊल असल्याचे म्हंटले जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा