
१५ हजार कैदी जेलमधून फरारनेपाळ : नेपाळमध्ये गेल्या चार दिवसांपासून भीषण अशांतता आणि हिंसाचार सुरू आहे. सरकारने अचानक काही लोकप्रिय सोशल मीडिया साइट्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर देशभरात तीव्र आंदोलन पेटलं. या निर्णयाचा निषेध करत असंख्य नागरिक रस्त्यावर उतरले. सुरुवातीला शांततेत सुरू झालेलं आंदोलन लवकरच हिंसक बनलं. आंदोलकांनी संतापाच्या भरात नेपाळचं संसद भवन पेटवून दिलं. एवढ्यावरच न थांबता, अनेक मंत्र्यांच्या घरांवरही हल्ले करण्यात आले. या हिंसक घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि आर्थिक तोटा झाल्याचं वृत्त आहे. राजधानीसह इतर अनेक भागात कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, आंदोलन उग्र होत असतानाच नेपाळमधून आणखी एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली असून त्यामुळे तणावाचं वातावरण अधिकच गंभीर झालं आहे.
नेपाळमध्ये उफाळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरू असलेल्या गोंधळाचा फायदा घेत विविध जेलमधून तब्बल १५ हजार कैदी फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. या कैद्यांच्या शोधमोहीमेसाठी भारत-नेपाळ सीमेवर कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. आतापर्यंत सशस्त्र सीमा दलाने (SSB) सीमेवरून ६० कैद्यांना पुन्हा पकडलं असून त्यांना सीमेवरील चौक्यांवर ठेवण्यात आलं आहे. फरार झालेल्या कैद्यांपैकी काही जण भारतातही शिरले असल्याचं वृत्त आहे. त्यापैकी २२ कैदी उत्तर प्रदेशात, १० कैदी बिहारमध्ये आणि ३ कैदी पश्चिम बंगालमध्ये अटककरण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली ही कारवाई सीमेवरील तणाव आणि भीती वाढवणारी ठरत आहे. नेपाळमधील अस्थिरतेचा फायदा घेऊन हे कैदी सुटले असून त्यांना नियंत्रणात आणणं हे दोन्ही देशांसमोर मोठं आव्हान बनलं आहे.
SSB ची मोठी कारवाई!अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांत सशस्त्र सीमा दलाच्या (SSB) जवानांनी उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालच्या सीमावर्ती भागात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान तब्बल ६० फरार कैद्यांना पकडण्यात यश आलं आहे. पकडण्यात आलेले सर्व कैदी संबंधित राज्यांच्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. प्राथमिक चौकशीत काही धक्कादायक माहितीही समोर आली आहे. अटक केलेल्या कैद्यांपैकी २ ते ३ जणांनी स्वतःला भारतीय नागरिक असल्याचा दावा केला आहे. या दाव्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी स्वतंत्र चौकशी सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. सीमेवर सुरू असलेली ही मोहीम नेपाळमधून फरार झालेल्या कैद्यांचा माग काढण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
भारतात हाय अलर्टनेपाळमध्ये सोशल मीडिया साइट्सवर बंदी आणण्याच्या सरकारी निर्णयानंतर संतापाची लाट उसळली आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसल्याने, मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि आंदोलनाला वेग आला. काठमांडूसह देशातील विविध शहरांमध्ये आंदोलन उग्र झालं आहे. आक्रमक आंदोलकांनी सरकारी कार्यालयांवर दगडफेक, वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केल्याच्या घटना घडल्या आहेत. राजधानी काठमांडूसह इतर भागांमध्ये पोलिस आणि आंदोलकांमध्ये तीव्र चकमती झाल्या असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आलं आहे. या आंदोलनामुळे नेपाळमध्ये तणावाचं वातावरण पसरलं असून, सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.