Wednesday, September 10, 2025

मनोज जरांगे यांची आणखी एक नवी मागणी... ओबीसी नेत्यांमध्ये मोठी खळबळ

मनोज जरांगे यांची आणखी एक नवी मागणी... ओबीसी नेत्यांमध्ये मोठी खळबळ

संभाजीनगर: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबईतील आझाद मैदानात ५ दिवस उपोषण करत, सरकारकडून आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यास यशस्वी ठरणारे मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारकडे आता नवीन मागणी केली आहे. ज्यात त्यांनी थेट छगन भुजबळ यांना मराठा आणि ओबीसीमध्ये तेढ निर्माण करत असल्याचा आरोप करत त्यांना तुरुंगात टाकण्याची मागणी केली आहे. त्यांची ही मागणी निश्चितच सरकारला घाम आणणारी आणि ओबीसी नेत्यांमध्ये खळबळ माजवणारी आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी नुकत्याच घेतलेल्या एका पत्रकार परिषदेद्वारे  छगन भुजबळ यांच्यावर वैयक्तिक टीका केली.  छगन भुजबळ हे सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यामुळे मराठा आणि ओबीसी समाजांमध्ये तेढ निर्माण होत आहे. देवेंद्र फडणवीस यांना छगन भुजबळामुळे डाग लागू नये, याची काळजी घेतली पाहिजे. छगन भुजबळांना आवर घालण्याची किंवा त्यांना तुरुंगात पाठवावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

जोपर्यंत भुजबळ आहेत, तोपर्यंत मराठा आणि ओबीसी समाज एकत्र येऊ शकत नाही- जरांगे पाटील

या पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे पाटील असे म्हणाले की, "छगन भुजबळ यांना नाव आणि प्रसिद्धीची खूप मस्ती आहे. ते सरकारसाठी मोठी डोकेदुखी बनले आहेत. भुजबळ सरकारला पद्धतशीरपणे अडचणीत आणत आहेत. जोपर्यंत भुजबळ आहेत, तोपर्यंत मराठा आणि ओबीसी समाज एकत्र येऊ शकत नाही. सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा हा माणूस मोठा नाही. त्याचे पाय धरा, खाली आपटा आणि त्याला तुरुंगात जाऊ द्या,” अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

हैदराबाद गॅझेटबाबत भुजबळ यांनी व्यक्त केलेल्या नाराजीवर केले भाष्य

मनोज जरांगे पाटील यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत, हैदराबाद गॅझेटबाबत भुजबळ यांनी व्यक्त केलेल्या नाराजीवर भाष्य केले. "तुम्ही जीआरवर नाराज असाल तर महाराष्ट्रात राहू नका, हिमालयात निघून जा", असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली. देवेंद्र फडणवीस यांनी जर मोठ्या मनाने ओबीसींसाठी उपस्थिती गठीत केली असेल, त्या उपसमितीने आणि उपसमितीच्या सदस्यांनी, जातीजातीमध्ये भांडण लावण्यापेक्षा त्या उपसमितीचा फायदा गोरगरीब ओबीसीच्या योजना राबवण्यासाठी केला पाहिजे. ओबीसीची उपसमिती झाली म्हणजे मराठ्याच्या विरोधात गरळ ओकायला नको किंवा मंत्रिमंडळाच्या बैठका घेऊन खोटे निर्णय घेणे हे व्हायला नको, असा टोलाही मनोज जरांगेंनी लगावला.

ओबीसी उपसमिती लोकांना जातीवाद वाटू नये

जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना, ओबीसी उपसमिती लोकांना जातीवाद वाटू नये. तसेच मराठा उपसमितीमध्ये आणि ओबीसी उपसमितीमध्ये जातीवाद वाढू नये, त्यासाठी मराठा उपसमिती आणि ओबीसी उपसमिती या दोन्हीमध्ये मराठा आणि ओबीसी समाजाचे मंत्री असावेत, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ओबीसींच्या उपसमितीमध्ये फक्त ओबीसी आणि मराठा उपसमितीमध्ये फक्त मराठा असा दुजाभाव नसावा. यावर सुद्धा बारकाईने लक्ष मुख्यमंत्र्यांनी ठेवलं पाहिजे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >