काठमांडू : भारताचा शेजारी असलेल्या नेपाळमध्ये भ्रष्टाचाराविरोधात तरुणाईने हिंसक आंदोलन सुरू केले आहे. याआधी नेपाळ सरकारने २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातल्याच्या निषेधार्थ तरुणांनी रस्त्यावर येऊन हिंसक आंदोलन केले होते. आंदोलनाला घाबरून सरकारने सोशल मीडियावरील बंदी रद्द केली. ही बंदी रद्द झाल्यानंतर नेपाळच्या तरुणांनी देशातील भ्रष्टाचाराविरोधात हिंसक आंदोलन सुरू केले. या आंदोलनाच्या दबावापोटी अखेर पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला आहे. ते सहकुटुंब दुबईला जाऊन राजाश्रयासाठी प्रयत्न करणार असल्याचे वृत्त आहे.
नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदी विरोधात आंदोलन करणाऱ्यांवर सरकारच्या आदेशानंतर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात १८ जणांचा मृत्यू झाला आणि २५० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले. या घटनेनंतर आधी नेपाळच्या गृहमंत्र्यांनी नंतर नेपाळच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला. पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा देताना देशाचे नेतृत्व उपपंतप्रधानांकडे सोपवली. या पार्श्वभूमीवर सरकार बरखास्त करावे आणि काळजीवाहू सरकारची स्थापना करावी यानंतर संसद विसर्जित करावी आणि नव्याने निवडणूक घ्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.






