मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! देशातील पहिली पर्यावरणपूरक आणि अत्याधुनिक सोयींनी सज्ज ई-वॉटर टॅक्सी आता सेवेत दाखल होत आहे. गेटवे ऑफ इंडिया ते जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीए) हा प्रवास आता अधिक सोयीस्कर आणि झपाट्याने होणार आहे. सध्या या मार्गावर लाकडी बोटींमधून प्रवास करताना सुमारे एक तास किंवा त्याहून अधिक वेळ लागत असे. पण, ई-वॉटर टॅक्सीमुळे हा प्रवास फक्त ४० मिनिटांत पूर्ण होणार आहे. प्रवाशांसोबतच जेएनपीएचे कर्मचारीदेखील या आधुनिक जलवाहतुकीचा लाभ घेणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या २२ सप्टेंबरपासून दोन ई-वॉटर टॅक्सी गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीएदरम्यान धावणार आहेत.
लाकडी बोटींना रामराम
सध्या गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीएदरम्यान प्रवासासाठी लाकडी बोटींचा वापर केला जातो. मात्र या बोटी जुना झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत नेहमीच प्रश्नचिन्ह निर्माण होते. याशिवाय, या बोटींमधून प्रवास करताना किमान एक तास लागतो, तर हवामान बिघडल्यास किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास हा वेळ आणखी वाढतो. त्यामुळेच जेएनपीएने अधिक सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि आधुनिक पर्याय म्हणून ई-वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. या नव्या सेवेमुळे प्रवासाचा वेळ तब्बल २० मिनिटांनी कमी होऊन केवळ ४० मिनिटांत गेटवे ते जेएनपीए प्रवास शक्य होणार आहे.
परदेशी नाही, पूर्णतः ‘मेड इन इंडिया’
ई-वॉटर टॅक्सी सेवेमुळे मुंबईकरांना प्रवासासाठी आणखी एक वेगळा आणि किफायतशीर पर्याय उपलब्ध होणार आहे. यामध्ये खास बाब म्हणजे ही वॉटर टॅक्सी परदेशातून आयात केलेली नसून, पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेड (एमडीएल) यांनी तयार केली आहे. त्यामुळे ही सेवा केवळ पर्यावरणपूरक नाही तर ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचं उत्तम उदाहरणही ठरणार आहे.
पुणे : पुण्यात तब्बल ३३ तास अखंड सुरू राहिलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत हजारो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. घरगुती तसेच मोठ्या मंडळांच्या ...
फक्त १०० रुपयांत जलप्रवास
ई-वॉटर टॅक्सी सेवेबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, भारतात तयार झालेल्या या दोन टॅक्सींपैकी एक सौरऊर्जेवर तर दुसरी विजेवर धावणार आहे. या दोन्ही टॅक्सी आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असून प्रत्येकीत २० प्रवाशांची क्षमता आहे. गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीए दरम्यान या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना सुमारे १०० रुपये इतकं भाडं मोजावं लागणार आहे. या ई-वॉटर टॅक्सींचे नियमित संचालन आणि देखभालीची जबाबदारी ‘भारत फ्रेट ग्रुप’कडे सोपवण्यात आली आहे.
मुंबईत ई-वॉटर टॅक्सीनंतर हायड्रोजन बोटी
भारत फ्रेट ग्रुपचे मालक सोहेल काझानी यांनी माहिती दिली की, सध्या जेट्टीवर चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. हे काम वेळेत पूर्ण झाल्यानंतर पहिल्याच दिवशी प्रवाशांना ई-वॉटर टॅक्सीची सेवा कोणत्याही अडथळ्याशिवाय उपलब्ध होणार आहे. याशिवाय, पुढील टप्प्यात चार हायड्रोजनवर चालणाऱ्या बोटी सेवेत दाखल करण्याचीही तयारी सुरू आहे. या उपक्रमामुळे प्रवाशांची संख्या वाढेल आणि प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक प्रवासाचा नवा आदर्श निर्माण होईल.