चीनवर ७-० असा एकेरी विजय मिळवत भारत जेतेपदाच्या लढतीत, दक्षिण कोरियाशी भिडणार
बिहार: हॉकी आशिया कपमधील सुपर-४ टप्प्यातील शेवटच्या सामन्यात भारत आणि चीन (Bharat vs Chin Hockey) यांच्यात एक जबरदस्त सामना झाला. बिहारमधील राजगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने ७-० च्या मोठ्या फरकाने विजय मिळवला आणि अंतिम फेरीचे तिकीट निश्चित केले आहे. आता भारताची ५ वेळा चॅम्पियन असलेल्या दक्षिण कोरियाशी विजेतेपदासाठी लढत होईल.
आशिया कपचा अंतिम सामना आज रविवारी भारत विरुद्ध दक्षिण कोरिया असा असणार आहे. दक्षिण कोरियाने मलेशियाला ४-३ ने हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तर, सुपर-४ टप्प्यात मलेशिया आणि चीन २-२ ने पराभूत झाले.
चीनला अक्षरशः लोळवले
पहिल्या क्वार्टरमध्ये भारताचा संघ आक्रमक हॉकी खेळताना दिसला. चौथ्या मिनिटालाच भारताने पहिला गोल केला आणि आघाडी घेतली. त्यानंतर ७ व्या मिनिटाला संघाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. दिलप्रीत सिंगने रिबाउंडवर गोल केला. पहिला क्वार्टर २-० ने संपला. पहिल्या क्वार्टरपासूनच चीनचा संघ कमकुवत दिसू लागला.
त्यानंतर भारताने हाफ टाइमपर्यंत ३-० अशी आघाडी घेतली होती. तिसऱ्या क्वार्टरच्या अखेरीस भारताने ५-० असा स्कोअर केला. तर चौथ्या क्वार्टरमध्ये अभिषेकने ४ मिनिटांत भारतासाठी २ गोल केले. येथून, चीनचे मनोबल खचले. शेवटी, भारताने ७-० ने विजय मिळवला.