
Ashish Warang Passed Away: 'दृश्यम', 'सूर्यवंशी', 'मर्दानी' आणि 'एक व्हिलन रिटर्न्स' सारख्या बॉलिवूडमधील अनेक सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम करणारे आशिष वारंग यांचे आज निधन झाले आहे. ते ५५ वर्षाचे होते, त्यांच्या मृत्यूच्या बातमीने हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. आशिष यांचे बंधू अभिजीत वारंग यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्टद्वारे आशिष यांच्या निधनाची माहिती दिली.
आशिष वारंग यांच्या मृत्यूचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही. ते बऱ्याच काळापासून आजारी होते. त्यांच्यावर मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांनी तिथेच अखेरचा श्वास घेतला. या गुणी अभिनेत्याने अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
'सूर्यवंशी' मधून ओळख
आशीष वारंग यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण पात्र साकारली आहेत. रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी' चित्रपटातून त्यांना सर्वाधिक ओळख मिळाली होती. या चित्रपटात ते अक्षय कुमार आणि कतरिना कैफसोबत झळकले होते.
हिंदीच्या दिग्गज कलाकारांसोबत काम
आशिष वारंग यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीत अजय देवगणसोबत 'दृश्यम' मध्ये काम केले आहे. त्यांनी राणी मुखर्जीसोबत 'मर्दानी' चित्रपटात देखील काम केले आहे. तसेच ते 'एक व्हिलन रिटर्न्स' चित्रपटाचाही भाग होते. तर त्यांचा संजय निरंजन दिग्दर्शित 'बॉम्बे' हा शेवटचा चित्रपट ठरला.
मराठी आणि साऊथ चित्रपटामध्येही केले काम
बॉलीवूड व्यतिरिक्त, आशिष वारंग यांनी 'धर्मवीर' या मराठी चित्रपटात काम केले आहे. याशिवाय त्यांनी दक्षिण चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यांनी मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. आशीष वारंग हे केवळ कलाकार म्हणून नव्हे तर चांगले माणूस म्हणून देखील सिने वर्तुळात प्रचलित होते. त्यांच्या चांगल्या वागणुकीमुळे त्यांनी आजवर केलेल्या प्रत्येक चित्रपटाच्या सेटवर लोकांची मने जिंकली आहेत. आणि याचमुळे त्यांच्या जाण्याने अनेकांना आपला शोक आवरता येत नाही आहे.
अमिताभ बच्चन आणि आमिर खानसोबत केले काम
आशिष वारंग यांनी त्यांच्या कारकिर्दीत काही मोठ्या कलाकारांसोबत काम केले होते. त्यांनी अमिताभ बच्चन, आमिर खान, रणवीर सिंग, कार्तिक आर्यन, आशुतोष राणा आणि जॉन अब्राहम यांच्यासोबत काम केले आहे. ते अनेकदा सोशल मीडियावर कलाकारांसोबतचे फोटो शेअर करायचे.
भाऊ अभिजीत वरंग यांनी पोस्टद्वारे दिली दुःखद बातमी
आशिष यांचे बंधू अभिजीत वारंग यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्टद्वारे आशिष यांच्या निधानाची माहिती दिली. “वारंग आशिष दादा, तुम्हाला खूप मिस करू. प्रथम तुम्ही हवाई दल अधिकारी म्हणून देशाची सेवा केली आणि नंतर अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली. आम्ही एक चांगला माणूस गमावला आहे.”, असे अभिजीत यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. आशिष यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीसह सोशल मीडियातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.