Friday, September 5, 2025

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यावर ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप, मुंबई पोलिसांनी धाडली लूकआउट नोटीस

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यावर ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप, मुंबई पोलिसांनी धाडली लूकआउट नोटीस

मुंबई: मुंबई पोलिसांनी शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि राज कुंद्रा (Raj Kundra) यांच्याविरुद्ध ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात लूकआउट नोटीस जारी केली आहे. त्यांच्यावर उद्योगपती दीपक कोठारी यांच्याकडून गुंतवणुकीच्या नावाखाली पैसे घेतल्याचा आणि ते वैयक्तिक वापरासाठी वापरल्याचा आरोप आहे. हा खटला त्यांच्या कंपनी बेस्ट डील टीव्हीशी संबंधित आहे. पोलिसांनी फसवणुकीच्या आरोपाखाली बीएनएसच्या कलम ४०३, ४०६ आणि ३४ अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्यांच्या वारंवार होणाऱ्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यांमुळे या जोडप्याविरुद्ध लूकआउट नोटीस जारी केली आहे. १४ ऑगस्ट रोजी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरुद्ध जुहू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कर्ज आणि गुंतवणुकीच्या नावाखाली मुंबईतील व्यावसायिक दीपक कोठारी याची सुमारे ६० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरुद्ध गंभीर आरोप केले

दीपक कोठारी हे लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेसचे संचालक आहेत, त्यांनी सांगितले की राजेश आर्य यांनी त्यांची शिल्पा आणि राज यांच्याशी ओळख करून दिली होती. त्यावेळी शिल्पा आणि राज कुंद्रा यांचा बेस्ट डील टीव्हीमध्ये ८७.६% हिस्सा होता.

दीपक कोठारी यांच्या मते, सुरुवातीला शिल्पा आणि राज कुंद्रा यांनी त्यांच्याकडे १२% व्याजदराने ७५ कोटी रुपयांचे कर्ज मागितले होते, परंतु नंतर त्यांनी कराचा बोजा कमी करण्यासाठी गुंतवणूक असल्याचे सांगून पैसे देण्यास राजी केले आणि दरमहा परतावा आणि मुद्दल दोन्ही परत मिळतील असे आश्वासन दिले.

दीपक कोठारी यांनी दावा केला की त्यांनी एप्रिल २०१५ मध्ये शेअर सबस्क्रिप्शन करारांतर्गत ३१.९५ कोटी रुपये आणि सप्टेंबर २०१५ मध्ये पूरक कराराद्वारे २८.५३ कोटी रुपये हस्तांतरित केले. ही संपूर्ण रक्कम कंपनीच्या एचडीएफसी बँक खात्यात जमा करण्यात आली. मात्र,  शिल्पा शेट्टी यांनी सप्टेंबर २०१६ मध्ये कंपनीच्या संचालक पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर, दुसऱ्या करारात अनियमितता आढळल्याने २०१७ मध्ये बेस्ट डील टीव्हीविरुद्ध दिवाळखोरीची कारवाई सुरू झाली.

दीपक कोठारी यांचा आरोप आहे की त्यांनी राजेश आर्य यांच्यामार्फत अनेकवेळा त्यांचे पैसे परत मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आले नाही. त्यानंतर त्यांनी औपचारिक तक्रार दाखल केली. या आधारावर, मुंबई पोलिसांनी भारतीय दंड संहिता (BNS) च्या कलम ४०३, ४०६ आणि ३४ अंतर्गत या जोडप्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा