
चंदीगड : पंजाब राज्यात पूरपरिस्थिती आणखीन बिकट झाली आहे. आणखीन सहा जणांना आपला जीव गमवावा लागला असल्यामुळे, मृतांचा आकडा आतापर्यंत ४३ वर पोहोचला आहे. पंजाब सरकारने यासंबंधी जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे ही आकडेवारी समोर आली आहे. पंजाब १९८८ नंतरच्या सर्वात मोठ्या पुराचा सामना करत आहे.
मृतांमध्ये अमृतसरमधील ४, बरनालामधील ५, होशियारपूरमधील ७, भटिंडामधील ३, गुरुदासपूरमधील १, लुधियानामधील ४, मानसामधील ३, पठाणकोटमधील ६, पटियालामधील १, रूपनगरमधील १ आणि मोहाली आणि संगरूरमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
सरकारच्या परिपत्रकानुसार, पंजाबमधील २३ जिल्हे आणि १६५५ गावे पुरामुळे बाधित झाली आहेत. पंजाबमधील पुरामुळे बाधित झालेल्या लोकांची संख्या तीन लाख ५५ हजार ७०९ इतके आहे.अमृतसरमध्ये पुरामुळे बाधित झालेल्यांची संख्या १ लाख १७ हजार ५३४ आहे. त्यानंतर गुरुदासपूरमध्ये १ लाख ४५ हजार लोक तर फिरोजपूरमध्ये ३९हजार ०७६, पठाणकोटमध्ये १५हजार ०७३, कपूरथलामध्ये ५ हजार ७२८ आणि मोहालीमध्ये ७ हजार लोक बाधित झाले आहेत.
पुराच्या पाण्यातून वाचविण्यात आलेल्या लोकांची संख्या १९हजार ४७४ वर पोहोचली आहे. गुरुदासपूरमधून सर्वाधिक ५५८१ लोकांना वाचवण्यात प्रशासनाला यश आले. तर अमृतसरमधून २७३४, बरनालामधून ३६९, फाजिल्कामधून २४२२, फिरोजपूरमधून २४९५, गुरुदासपूरमधून ५५८१ लोकांना वाचवण्यात आले. तसेच होशियारपूरमधून १६१५, जालंधरमधून ४७४, कपूरथळामधून १४२८, मानसामधून १६, मोगामधून ११५, रोपरमधून ६५, पठाणकोटमधून ११३९, तरनतारनमधून २१ लोकांना वाचवण्यात आले आहे. अशा प्रकारे एकूण १९ हजार ४७४ लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे.
बचाव कार्य करण्यासाठी बाधित जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या ३१ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. भारतीय लष्कर आणि हवाई दलाच्या बारा तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत, तर ८ तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. भारतीय हवाई दल आणि लष्कराचे ३० हून अधिक हेलिकॉप्टर बचाव आणि मदतकार्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. बीएसएफ देखील राज्य सरकारला बचाव कार्यात मदत करत आहे, तर राज्य सरकारने बचाव कार्यासाठी १२३ बोटी पुरवल्या आहेत.