
श्रेयस अय्यर २५ तर, जैस्वाल अवघ्या चार धावांवर बाद
मुंबई : दुलीप ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धा सध्या सुरू असून बीसीसीआयच्या बंगळूरुतील सेंटर ऑफ एक्सलन्स मैदानात पश्चिम विभाग आणि मध्य विभाग संघात उपांत्य सामना खेळला जात आहे. गुरुवारपासून (४ सप्टेंबर) हा सामना सुरू झाला आहे. सामन्याचा पहिला दिवस पश्चिम विभागाच्या ऋतुराज गायकवाडने गाजवला आहे. पण त्याचे द्विशतक अगदी थोडक्यात हुकले.
या सामन्यात पश्चिम विभागाचा कर्णधार शार्दुल ठाकूरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र पहिल्या ४ षटकातच त्यांनी दोन विकेट्स गमावल्या. सलामीला खेळायला आलेले यशस्वी जैस्वाल ४ धावांवर आणि हार्विक देसाई १ धाव करून बाद झाले.
जैस्वालला खलिल अहमदने, तर हार्विकला दीपक चाहरने बाद केले. पण नंतर आर्य देसाई आणि ऋतुराज गायकवाड यांनी डाव सावरला. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली. पण हर्ष दुबेने २७ व्या षटकात आर्य देसाईला चकवले आणि ३९ धावांवर त्रिफळाचीत केले. त्यानंतर श्रेयस अय्यरने काही काळ ऋतुराजची साथ दिली. त्यांच्यातील भागीदारी दरम्यान ऋतुराजने त्याचे अर्धशतक साजरे केले. पण श्रेयसला ३६ व्या षटकात खलील अहमदने २५ धावांवर त्रिफळाचीत केले. शम्स मुलानीही १८ धावा करून बाद झाला. पण त्यानंतर तनुष कोटियनने ऋतुराजची भक्कम साथ दिली. या दरम्यान १३१ चेंडूत ऋतुराजने शतक झळकावले. त्यानंतर त्याने धावांची गती आणखी वाढवली होती. त्याने दीडशतक पूर्ण केल्यानंतर तो पहिले द्विशतकही पहिल्याच दिवशी करेल, असे चित्र समोर दिसत होते.
भारतीय संघाचे ठोठावले दरवाजे
सारांश जैनने ७५ व्या षटकात ऋतुराजला बाद केले. ऋतुराज २०६ चेंडूत १८४ धावा करून यष्टीचीत झाला. त्याने या खेळीदरम्यान २५ चौकार आणि १ षटकार मारला. त्याचं द्विशतक थोडक्यात १६ धावांनी हुकले. मात्र संघ दबावात असताना चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत ऋतुराजने केलेल्या या खेळीमुळे त्याने सर्वांचे लक्ष पुन्हा वेधले असून भारतीय संघाचे दार ठोठावले आहे. तो वर्षभरापासून भारतीय संघातून दूर आहे. पण देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीने त्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याने तनुष कोटियनसोबत ६ व्या विकेटसाठी १४८ धावांची भागीदारीही केली. या भागीदारीदरम्यान तनुषनेही अर्धशतक पूर्ण केले.
पहिल्या दिवशी पश्चिम विभागाने ओंलाडला साडेतीनशेचा टप्पा
दरम्यान, ऋतुराज बाद झाल्यानंतरन तनुषने शार्दुल ठाकूरला साथीला घेत डाव पुढे नेला. त्यामुळे पश्चिम विभागाने ३५० धावांचा टप्पा पहिल्याच दिवशी ओलांडला आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा पश्चिम विभागाने ८७ षटकात ६ बाद ३६३ धावा केल्या. मध्य विभागाकडून पहिल्या दिवशी गोलंदाजी करताना खलीली अहमद आणि सारांश जैन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या, तर हर्ष दुबे आणि दीपक चाहर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.