Saturday, October 25, 2025
Happy Diwali

विक्रमादित्य वैदिक घड्याळाचे उज्जैनमध्ये अनावरण

विक्रमादित्य वैदिक घड्याळाचे उज्जैनमध्ये अनावरण
उज्जैन : बहुचर्चित विक्रमादित्य वैदिक घड्याळ आणि मोबाइल ॲपचे अनावरण मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. या माध्यमातून अचूक वेळ समजू शकेल. कालगणनेची ही वैदिक पद्धत भारताचा समृद्ध प्राचीन, सांस्कृतिक वारसा असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. या घड्याळाच्या निर्मितीमध्ये राज्याच्या उच्चशिक्षण आणि सांस्कृतिक विभागाने मोलाची भूमिका पार पाडली. या वैदिक कालगणनेमध्ये पहिल्या सूर्योदयापासून ते दुसऱ्या सूर्योदयापर्यंतचा काळ विचारात घेण्यात येतो. यातही वेळेचे तीस तासांमध्ये विभाजन करण्यात येते. त्यातील प्रत्येक तासांमध्ये ४८ मिनिटांचा समावेश आहे. सूर्योदयाला हे घड्याळ सुरू होते ते पुढील तीस तास चालते.इंग्रजी तारखांमध्ये सातत्याने बदल होत असतो पण भारतीय दिनदर्शिका ही मात्र ऋतुचक्र आणि निसर्गाशी संबंधित असल्याचे मुख्यमंत्री यादव यांनी यावेळी सांगितले. या ॲपमध्ये १८९ पेक्षाही अधिक भाषांचा समावेश असून नागरिकांना या माध्यमातून केवळ दिनदर्शिकाच नाही तर सात हजार वर्षांची दुर्मिळ धार्मिक माहिती मिळू शकेल. श्रावण आणि भाद्रपद महिन्यातील पर्जन्यवृष्टी तसेच ऋतुचक्रातील अन्य बदल या वैशिष्ट्यपूर्ण कालगणनेच्या माध्यमातून समजू शकतील. अमावस्या आणि पौर्णिमेला जसा चंद्र आणि समुद्रावर परिणाम होतो तसाच माणसाच्या शरीरावर देखील त्याचे परिणाम होत असल्याचे सिद्ध झाले आहे. भारतीय कालगणनेमध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताचा विचार केला जातो.येथे मध्यरात्रीच्या बारापासूनचा कालावधी विचारात घेण्यात येत नाही. भारतीय कालगणनेमध्ये ३० मुहूर्त, २४ तास यांचे वैशिष्ट्यपूर्ण गणितीय समीकरण आहे. यातही शुभाशूभ मुहुर्ताचा विचार करण्यात आला आहे. जीवनशैलीच्या व्यवस्थापनामध्ये निसर्गाचा विचार करण्यात आला आहे.

उज्जैनला महत्त्व

प्राचीनकाळी उज्जैन हे कालगणनेच्यादृष्टीने महत्त्वाचे केंद्र होते, हे सप्रमाण सिद्ध झाले आहे. वैदिक गणित आणि पंचांगाच्या अचूकतेचा आता जगाने स्वीकार केला आहे. ज्या ठिकाणी संगणक अपयशी ठरते तिथे खगोलज्योतिषशास्त्र हे अधिक बिनचूक ठरल्याचे दिसून येते. आता भोपाळमध्ये या वैदिक घड्याळाची स्थापना करून गौरवशाली भारतीय परंपरेला उजाळा देण्यात आला आहे, असे यादव यांनी नमूद केले. राजा विक्रमादित्याची कारकीर्द हे भारताचे सुवर्णयुग म्हणून ओळखले जात असे. त्यांच्या काळात कालगणनेचे हे घड्याळ तयार करण्यात आले. पंचांग, तिथी, नक्षत्र, योग, दिवस, महिना, व्रत आणि उत्सव यांच्या माहितीबरोबरच साधारणपणे ३१७९ या विक्रम संवतापासूनच्या सणावारांची मागील सात हजार वर्षांतील माहिती याद्वारे मिळू शकते.
Comments
Add Comment