Tuesday, September 2, 2025

आंदोलकांना आझाद मैदानातून हुसकावून लावणे सरकारला महागात पडेल: मनोज जरांगे

आंदोलकांना आझाद मैदानातून हुसकावून लावणे सरकारला महागात पडेल: मनोज जरांगे
मुंबई: मनोज जरांगे पाटील यांचा आझाद मैदानावरील उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. मात्र, या मराठा आंदोलनात सहभागी झालेल्या काही हुल्लडबाजांमुळे मुंबईकरांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणात दक्षिण मुंबईत दाखल झालेल्या आंदोलकांच्या गाड्यांमुळे सदर ठिकाणी मोठी वाहतूककोंडी झाली. ज्यामुळे उच्च न्यायालयाने आंदोलकांना रस्ते रिकामे करण्याचे आदेश दिल्यानंतर, नियमाची पायमल्ली केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांनादेखील आझाद मैदान खाली करण्याची नोटीस दिली. ज्यावर आता जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.  आंदोलकांना आझाद मैदानातून हुसकावून लावणे सरकारला महागात पडेल असा थेट इशाराच त्यांनी आता राज्य सरकारला दिला आहे.

मेलो तरी हटणार नाही: जरांगे पाटील

मनोज जरांगे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पहिल्यापासूनच जोरदार टीका करताना दिसले आहेत. त्यांनी आजही त्याची री ओढली आहे.  "सरकारने भीती दाखवली तरीही आम्ही मागे हटणार नाहीत. मी तर मेलो तरीही या आझाद मैदानातून हटत नाही, काय व्हायचे ते होऊ द्या. याचे दुष्परिणाम तुम्ही (देवेंद्र फडणवीस) जाणे आणि मराठे जाणे. मराठे काय असतात ते पुन्हा साडेतीनशे वर्षांनी बघायचे असेल तर त्याला माझा नाईलाज आहे." असे ते म्हणाले. इतकेच नव्हे तर सरकारला नासकी सवय लागल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

आमची सरकारसोबत चर्चा करायची तयारी, पण...

पुढे जरांगे पाटील यांनी म्हटले की, आमची सरकारसोबत चर्चा करायची तयारी आहे. ३० ते ३५ मंत्री या नाही तर दोघे या आमची चर्चा करण्याची तयारी आहे, असे त्यांनी म्हटले. त्यांचा आम्ही सन्मान करू. कबड्डी खेळायच्या आधी खो द्यायच्या नसतो, असे म्हणत त्यांनी थेट सरकारला मोठा इशारा दिला आहे.

आरक्षणावर सरकार नवा जीआर काढण्याच्या तयारीत

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर महाराष्ट्रात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. न्यायालयाच्या सूचना आणि विविध घटकांच्या मागण्यांमुळे हा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे. या संदर्भात मराठा आरक्षण उपसमितीची एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उपसमितीने मराठा आरक्षणाच्या नव्या मसुद्यावर चर्चा केली. या मसुद्यात कुणबी प्रमाणपत्रे देण्याच्या प्रक्रियेत काही महत्त्वाचे बदल प्रस्तावित करण्यात आले आहेत. सध्याच्या पद्धतीत अनेक अडचणी येत असल्याने सरकार या प्रक्रियेत सुधारणा करण्याचा प्रयत्न करीत आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >