
ओबीसी नेत्यांसोबतच्या बैठकीत काय निर्णय झाला, छगन भुजबळांनी दिली प्रतिक्रिया
मुंबई : मराठा समाजाला ओबीसीतून १० टक्के आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) यांनी मुंबईत आंदोलन पुकारलं असून आझाद मैदानात या आंदोलनाचा चौथा दिवस पार पडला. मात्र, दुसरीकडे ओबीसी नेत्यांचा जारांगेच्या प्रमुख मागणीला तीव्र विरोध असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील ओबीसी नेत्यांची आज मंत्री छगन भुजबळ (Chhagan bhujbal) यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. या बैठकीला राज्यातील प्रमुख ओबीसी नेत्यांची उपस्थिती होती. या बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसेच, मराठा आणि कुणबी एक, हा मूर्खपणा असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यासाठी, हायकोर्टाचा संदर्भही देण्यात आला.
ओबीसी नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसीची मराठा आंदोलनावर काय भूमिका आहे? हे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यावेळी, हायकोर्टाचा दाखल देत मनोज जरांगे पाटील यांच्यावर टिका केली.
छगन भुजबळ काय म्हणाले?
मुंबईत आज मराठा आरक्षणावर आंदोलन सुरू आहे, पण मराठा आणि कुणबी एक आहे हा मूर्खपणा असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. मराठा समाज हा मागास नाही असे निरीक्षण नोंदवले आहे. त्यामुळं मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देता येणार नाही. असे छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.
मराठा कुणबी एक होऊ शकत नाही असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलं आहे. ५० टक्के आरक्षण हे सामाजिकदृष्ट्या मागास असणाऱ्यांसाठी आहे. पण मराठा समाज हा सामाजिक मागास ठरत नाही असे भुजबळ म्हणाले. आमच्या ओबीसीच्या आरक्षणात दुसरे वाटेकरी नको असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले. शरद पवार असो की देवेंद्र फडणवीस कोणीही ओबीसीमध्ये एससीमध्ये एसटीमध्ये नवीन जात टाकू शकत नाही असेदेखील त्यांनी पुढे सांगितले. आमच्यावर अन्याय झाला तर लाखोंच्या संख्येने मुंबईत येणार असल्याचे भुजबळ म्हणाले. ओबीसीला धक्का लावणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले - भुजबळ मी ओबीसीचा नेता म्हणूनच इथे बसलो आहे. मंत्रीमंडळात सुद्धा ओबीसीचा नेता म्हणूनच बसलो असल्याचे भुजबळ म्हणाले. आमदारांनी मागणी केली म्हणजे कायदा होत नाही. उद्या कुणीही काहीही मागणी केली तर होत नाही असे भुजबळ म्हणाले. अधिवेशनात ठराव केला तरी होत नाही, नियमाचा रस्ता आहे, त्यानुसार जावे लागेल असे भुजबल म्हणाले. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यांनी ओबीसीला धक्का लावणार नाही असे सांगितल्याचे भुजबळ म्हणाले.